नवी दिल्ली – नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन या महिलांच्या एका संघटनेनेही बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणांतील आरोपींची शिक्षा माफ करून त्यांना तुरूंगातून सोडून देण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्या याचिकेवर सुनावणी घेण्यास कोर्टाने अनुमती दर्शवली आहे. या प्रकरणात ज्या आव्हान याचिका दाखल करण्यात आल्या आहेत त्याला जोडूनच या याचिकेवरील सुनावणीही होणार आहे.
पाल्क सामुद्रधुनीत आढळली संशयास्पद बोट, भारतीय नौदलाकडून कारवाई
आरोपींना सोडून देण्याच्या निर्णयाच्या संबंधात गुजरात सरकारने त्यांचे जे म्हणणे सादर केले आहे त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत त्यात अन्य निकालांचेच दाखले खूप आहेत पण तथ्यात्मक बाबी त्यात खूप कमी आहेत असे न्यायालयाने, 18 ऑक्टोबर रोजी सांगितले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 29 ऑक्टोबरला होणार आहे.
सन 2002 मध्ये गोध्रा येथे कार सेवकांच्या डब्याला आग लावण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर गुजरातेत दंगली उसळल्या. दंगलीतून पळून जात असताना बिल्कीस बानो 21 वर्षांची आणि पाच महिन्यांची गर्भवती होती तेव्हा तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. तसेच तिच्या कुटुंबातील सात जणांना जिवंत जाळून मारण्यात आले. त्यात तिच्या तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश होता. या प्रकरणातील सर्व आरोपींना गुजरात सरकारने माफी देऊन त्यांची कारागृहातून सुटका केली होती. गेली 15 वर्षे हे आरोपी कारागृहात होते.