नवी दिल्ली : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या कोरोमंडळ एक्सप्रेस दुर्घटनेच्या वेळी एका महिलेचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. ‘जया वर्मा सिन्हा’ या महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हे अत्यंत संवेदनशील प्रकरण हाताळण्यात आले होते. ओडिशा दुर्घटनेच्या प्रकरणाचे पीएमओ कार्यालयाला पॉवर पॉइंट प्रेजेंटेशन सादर केले होते. त्याच जया वर्मा सिन्हा यांची रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने जया वर्मा सिन्हा यांची रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या 105 वर्षांच्या इतिहासात हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. जया वर्मा सिन्हा या आज आपल्या नवीन पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
रेल्वे बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षपदी जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जया वर्मा सिन्हा या अलाहाबाद विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. 1988 मध्ये त्या भारतीय रेल्वे वाहतूक सेवेत (IRTS) रुजू झाल्या होत्या. आतापर्यंत त्यांनी तीन रेल्वे झोनमध्ये काम केलं आहे. यामध्ये उत्तर रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे आणि पूर्व रेल्वेचा समावेश आहे. सध्या सिन्हा या रेल्वे बोर्ड सदस्य (संचालन आणि व्यवसाय विकास ) या पदावर कार्यरत होत्या. त्यांनी रेल्वेत 35 वर्षाहून अधिक काळ रेल्वेत सेवा बजावली आहे.
अनिल कुमार लाहोटी हे जया वर्मा सिन्हा यांच्याआधी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यांच्या जागी आता सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिन्हा आज पदभार स्वीकारणार आहेत. त्यांचा कार्यकाळ हा 31 ऑगस्ट 2024 रोजी संपणार आहे. विशेष म्हणजे सिन्हा 1 ऑक्टोबरला निवृत्त होणार आहेत. त्यांच्या उर्वरित कार्यकाळासाठी त्यांची पुन्हा नियुक्ती केली जाणार आहे.
भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, रेल्वेचे सर्वोच्च अधिकारी असतात. त्यांचा सध्याचा पगार सुमारे 2.25 लाख रुपये प्रति महिना आहे. यासोबतच त्यांना विशेष भत्ता, घर, प्रवास आणि इतर सुविधांसारखे फायदेही मिळतात. रेल्वे विभागाचे अध्यक्ष हे भारतीय रेल्वेचे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. जे रेल्वे सेवांच्या दिशा, विकास आणि संचालनाशी संबंधित निर्णय घेतात.