सौ. अर्चना देशमुख
राजकीय क्षेत्र समाजकारणचे विस्तारित क्षेत्र आहे. इथे आपला संबंध लोकांशी येत असतो. त्यामुळे तोही माणूस आहे, त्याच्याबद्दल तुमच्या मनात आदरभाव आहे आणि शक्य त्याप्रकारे मदत करण्यासाठीच मी लोकप्रतिनिधी, किंवा पक्षाची पदाधिकारी झालेली आहे, असा मानवतावादी दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे. करता आला पाहिजे.
केंद्र सरकारने महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत 50 टक्के आरक्षणानंतर आता महिलांना आता लोकसभा आणि विधानसभेचे 33 टक्के दरवाजे उघडले गेले आहेत. हे सगळं विनासायास होणार नाही. त्याला अजून खूप अडथळे आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्षात अंमलात येईल तेव्हा खरे. पण येणार हे नक्की. आणावेच लागेल.अर्थात आपण त्याबद्दल नंतर बोलू.
आपण महिला म्हणून राजकीय क्षेत्रात काम करत असताना कोणकोणत्या घटकांबरोबर काम करावे लागते आणि यासाठी लागणारे कौशल्य याबद्दल बोलत असताना एक महत्वाचा विषय ज्याला बगल देऊन आपण पुढे जाऊ शकत नाही तो म्हणजे मानवतावाद. कोणत्याही क्षेत्रात असा, कोणीही असा सगळ्यात आधी आपण एक चांगला माणूस असणे गरजेचे आहे. मुळातच हळव्या असणाऱ्या महिला, प्रत्येक गोष्टीचा विचार भावनिक पातळीवर करतात. पण हळवेपणा, भावनिकता याबरोबर मानवतावादी दृष्टिकोन विकसित करणे खूप महत्वाचे आहे. मानवतावादी बना हे आपले ब्रीदवाक्यच असले पाहिजे.
आपण निवडून आल्यांतर वेगवेगळ्या पद्धतीने काम करू शकतो. त्यापैकी एक म्हणजे हुकूमशाही पद्धतीने. जिथे इतर लोकांशी विचारविनिमय करण्याच्या फंदात न पडता ती व्यक्ती सगळे निर्णय स्वतःच घेत असते. वेळ पडली तर कमीपणा घेणे त्या व्यक्तीला आवडत नाही. मी काही असे लोक बघितले आहेत जे समोरच्या व्यक्तीला समजून न घेता अद्वातद्वा बोलले आहेत. पण वेळ आल्यानंतर लोकांनी त्या व्यक्तींना त्यांची जागाही दाखवून दिली हेही लक्षात घेण्यासारखे आहे. हुकूमशाह वृत्तीने तुम्ही खूप काळ राजकीय मैदानात टिकू शकत नाही.
अजून एक पद्धत असते ती म्हणजे थंड… नियमावर बोट ठेवून. चाललंय तस चालू दे, त्यात फार न करण्याची इच्छा असणारे. अगदी कोरडी आणि वस्तुनिष्ठ व्यक्ती लोकांना नाही पटत. आणि आपणही खूप काम केले, मिळालेल्या संधीला, पदाला न्याय देऊ शकलो नाही याची रुखरुख लागून राहते. पण तुमची कामाची पद्धत मानवतावादी आहे. तुम्ही प्रगतीचा विचार करता, प्रगतीचा आग्रह धरता ही गोष्ट लोकांना खूप भावते. निवडून आल्यानंतर किंवा पदाधिकारी झाल्यानंतर तुम्ही लोकांची 100 टक्के कामे करू शकतच नाही.
किंवा लोक तुमच्यावर 100 टक्के खुश पण नसतात. पण तुम्ही काम करण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब केला आहे हे खूप मोठ्या कालावधीपर्यंत लोकांच्या लक्षात राहते. शिवाय आपण लोकांना अग्रक्रम देतो, प्राधान्य देतो, सन्मानाने वागवतो हे लोकांना खूप आवडते. हे जेव्हा आपल्या कृतीतून दिसून येते, तेव्हा आपल्यात आणि जनतेत चांगले बंध तयार होतात. हे बंध खूप महत्वाचे असतात. कारण माझ्या राजकीय कारकिर्दीत एक लक्षात आले ते म्हणजे आपल्याला वरच्या पदावर किंवा पातळीवर ओढून घेतले जात नसतं तर प्रत्यक्षात तुमच्याबरोबर, तुमच्या हाताखाली काम करणारे लोक तुम्हाला वर उचलून ठेवत असतात.
आणि म्हणूनच मानवतावादी बना. महिला मुळातच संवेदनशील असतात. लोकांची कामे करण्यात तत्पर राहू शकतात. त्यात मानवतावादी दृष्टीकोन ठेवून पुढे जात राहिले तर समाजासाठी काम करणे सोपे तर होतेच पण आपल्याला कामाचा आनंदही मिळतो आणि काम केल्यामुळे आपली प्रतिमा उजळ होते. कै. सुषमा स्वराज यांचं उदाहरण यानिमित्ताने आठवते. त्या केंद्रात मंत्री राहिल्या. संवेदनशीलता जपून लोकांची काम करण्यासाठी त्या पुढाकार घेत असतं. त्यामुळेच परराष्ट्रमंत्री असताना त्यांनी मानवतावादी दृष्टीकोनातून अनेकदा मोठे काम केले. परदेशात अडकलेल्या अनेक भारतीयांची सुटका करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड म्हणूनच अनेकांच्या स्मरणात राहते. त्याशिवाय अशा कामामुळे त्यांच्या कामाबद्दलचा आदरही वाढतो.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अशाच प्रकारे मानवतावादी दृष्टीकोनातून अनेक कामे केली आहेत. बांगला देशाला मुक्ती मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेला धोरणात्मक निर्णय आणि त्याची अंमलबजावणी म्हणजे मानवतेसाठी केलेला संघर्षच आहे. देशातील गरीबी हटविण्यासाठी त्यांनी केलेली घोषणाही माणसाचे जगणे सुकर करण्यासाठीच होती. त्यामुळे सार्वजनिक जीवनात कुठेही काम करा. पण मानवतादी दृष्टीकनातून पुढे जात राहिला तर होणारे काम मानसिक आनंद देणारे आहे. लोकांचा आदर मिळवून देणारे आहे.