पुणे – पुणे परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, नदी पात्रामध्ये सुरू असणारा 1712 क्युसेक विसर्ग वाढवून आज पहाटेपासून 2568 क्यूसेक करण्यात येत आहे.
धरण क्षेत्रात सतत पडत असणाऱ्या पावसामुळे धरण पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे खडकवासला धरणाच्या (Khadakwasla Dam) सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रात्री 1712 क्युसेक एवढा असणारा विसर्ग वाढवून आज पहाटे 03:00 वा. 2568 क्यूसेक करण्यात येत आहे. त्यासोबतच आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता असल्याची माहिती मुठा कालवे पाटबंधारे उपविभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, सध्यस्थितीत प्रकल्पातील चार धरणांत मिळून एकूण पाणीसाठा 97 टक्के म्हणजे 28.23 टीएमसी इतका झाला आहे. दरम्यान खडकवासला धरणात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मुठा नदीत पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. विसर्ग केल्यामुळे नदीकाठावरील गावांना शेतीसाठी पाणी मिळेल.
तसेच उजनी धरणात सुद्धा पाणी पोहोचेल. मात्र, यंदा पावसाने दीड महिन्यांपासून विश्रांती घेतली. त्यामुळे धरणातील पाणीसाठा स्थिर होता. मागील दोन दिवसांपासून चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत.
मागील 24 तासांत खडकवासला 55 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पानशेत-46, वरसगाव-45 आणि टेमघर धरणात 65 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सध्यस्थितीत खडकवासला धरणातून कालव्याद्वारे 1 हजार 30 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पानशेत धरणातून पॉवरहाऊसद्वारे 600 क्युसेक तर वरसगाव धरणातून 1 हजार 50 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाने सांगितले..