संदीप घोडके
येरवडा : शहरातील करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुण्यात असतानाच त्यांच्या बैठकीच्या ठिकाणापासून अवघ्या 7 ते 8 किलोमीटर अंतरावरील महापालिकेच्या कोवीड सेंटर मधील अनागोंदी कारभाराने शहरातील आणखी एका महिलेचा बळी घेतला आहे.
समाज कल्याण विभागाच्या विश्रांतवाडी मधील संत ज्ञानेश्वर वसतीगृहात हा प्रकार घडला आहे. करोना झाल्याने या कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आलेल्या या महिलेस गुरूवारी पहाटे अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तीची प्रकृती बिघाडली. मात्र, त्यानंतर तब्बल 12 तासांनी या महिलेस या कोविड सेंटर मधून उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र, तो पर्यंत या महिलेने आपला प्राण सोडला होता.
टिंगरे नगर भागातील ही 45 वर्षीय महिलेस करोना सदृश लक्षणे दिसल्याने या महिलेने आपल्या पतीसह येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतीक केंद्राच्या करोना चाचणी केंद्रात तपासणी करून घेतली. त्यात, या दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. मात्र, या महिलेस सर्दी, कफ तसेच खोकला आणि श्वास घेण्यास त्रास असतानाही हॉस्पीटलमध्ये दाखल न करता पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पतीसह संत ज्ञानेश्वर वसतीगृहातील कोवीड सेंटर मध्ये सायंकाळी पाठविंण्यात आले.
या ठिकाणी तिसऱ्या मजल्यावर या महिलेस तर दुसऱ्या मजल्यावर तिच्या पतीला ठेवण्यात आले. मात्र, रात्री साडेबाराच्या सुमारास या महिलेस अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिने ही माहिती नवऱ्याला कळविली. त्यानंतर या महिलेच्या पतीने डॉक्टरांना वारंवार तिला श्वास घेण्यास त्रास होतोय, तपासणी करा अशी विनंती केली. मात्र, कर्मचाऱ्यांनी काही होणार नाही दोन तीन दिवस असा त्रास होईल नंतर बरे वाटेल असे सांगत दुर्लक्ष केले.
त्यानंतर गुरूवारी सकाळी पुन्हा या महिलेस आणखी त्रास सुरू झाला. त्यामुळे या महिलेच्या पतीने पत्नीला ऑक्सिजन देण्याची विनंती डॉक्टरांकडे केली. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले, त्यानंतर सकाळी 11 वाजता ही महिला बेशुध्द पडली. मग तिच्या पतीने आरडा ओरडा केल्यानंतर या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी या महिलेची तपासणी केली आणि तिला ऑक्सिजन लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही महिला बेशुध्द असल्याने तिला खाली आणण्यासाठी व्हिलचेअर अथवा स्ट्रेचरही नव्हते, त्यामुळे बेडशीटची झोळी करून या महिलेस इतर रूग्णांनी खाली आणले.
ऑक्सिजन असूनही गमावला जीव
या सेंटरमध्ये 2 ऑक्सिजनचे बेड आहेत. एका स्वतंत्र खोलीत हे बेड आहेत. या महिलेस ऑक्सिजनच्या बेडच्या खोली जवळ आणल्यानंतर खोलीच्या कुलूपाची चावीच नव्हती. त्यामुळे हे कुलूप तोडावे लावले, त्यानंतर ऑक्सिजनच्या सिलें डरचा व्हॉल्व्ह सुरू करण्यासाठी त्याचा पानाच उपलब्ध नव्हता. त्यामुळे सिलेंडर आणि ऑक्सिजन असूनही तो वापरता आला नाही. तो पर्यंत महिलेची प्रकृती आणखीनच खालावली होती. त्यामुळे या सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी रूग्णवाहिका बोलाविली.
मात्र, ही रूग्णवाहीका यायलाही तब्बल अर्धा ते पाऊन तास गेला. मात्र, तो पर्यंत या महिलेने आपला जीव गमावलेला होता. रूग्णवाहीका आल्यानंतर दुपारी 1 च्या सुमारास या महिलेस ससून मध्ये पाठविण्यात आले. मात्र, ससूनने या महिलेस मृत घोषीत केले.
दरम्यान, या प्रकरणी संबधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी येरवडा नागरीक कृती समितीने केली आहे.