पौड -मुळशी तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. या वर्षीही पावसाचे आगमन वेळेत झाले. मात्र गेली बरेच दिवस पावसाने दडी मारल्याने भात पीक पिवळे पडले आहे.
पावसाच्या आगमनाने पौड परिसर, कोळवण खोरे, माले खोरे, मुळशी धरण परिसर, रिहे खोरे, भादस खोरे मुळशीतील सर्व भागात लागवड झाली आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी चिखलणी करून भात लागवडीस केली आहे. परंतु सध्या भात लागवड केलेल्या रोपांना पाणी उपलब्ध होत नाही.
आधीच करोनामुळे सगळेच आर्थिक अडचणीत असून त्यात लागवडीसाठी या वर्षी कोकणातील कातकरी बांधवांनी हजेरी लावली नाही. त्यातून शेतकऱ्यांनी भात लागवड पूर्ण केली. तसेच भात पिकावरील खते व औषधे यांचा खर्चाचा अधिक भार शेतकऱ्यांवर पडला आहे. पाऊस लवकरात लवकर मुळशीत दाखल झाला नाही तर भाताची रोपे पिवळी पडून करपून जाईल, अशी भीती आहे. मुळशीत भात लागवडीखाली येणारे क्षेत्राचे प्रमाण कमी होऊ शकते. याचा परिणाम म्हणून यावर्षीपेक्षा पुढील वर्षी तांदळाचा बाजारभाव वाढू शकतो, असे वाळेण गावचे प्रगतशील शेतकरी दत्तात्रय साठे, दत्ता लायगुडे व राहुल साठे यांनी सांगितले.