नवी दिल्ली -देशात करोनामुक्त झालेल्या बाधितांची संख्या 10 लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे सक्रिय बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जवळपास दुपटीपर्यंत पोहोचली आहे. करोना संकटावर मात करण्यासाठी ती घडामोड आशा पल्लवित करणारी आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या 5 लाख 28 हजार 242 सक्रिय बाधित आहेत. मागील काही दिवसांपासून करोना संसर्ग झालेले रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.
बाधित बरे होण्याचे देशातील प्रमाण 64.44 टक्के इतके आहे. ते प्रमाण एप्रिलमध्ये केवळ 7.85 टक्के इतके होते. देशातील करोना मृत्यूदरातील घटही दिलासादायी आहे. जूनच्या मध्याला 3.33 टक्के असणारा मृत्यूदर आता 2.21 टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
बाधित संख्येने ओलांडला 16 लाखांचा टप्पा; एकाच दिवसात 52 हजारांची उच्चांकी भर
देशात बुधवार सकाळपासून 24 तासांत तब्बल 52 हजार 123 नवे करोनाबाधित आढळले. एका दिवसात प्रथमच 50 हजारांचा टप्पा ओलांडला गेला. त्यामुळे देशातील बाधितांची संख्या 16 लाखांवर गेली आहे. करोना संसर्गाने आणखी 775 बाधित दगावले. त्यामुळे देशातील करोनाबळींची संख्या 35 हजारांवर पोहोचली आहे.