वडगाव मावळ – आता मोदी लाटेवर निवडून येणे सोपे नाही, असे आमदार सुनील शेळके पत्रकार परिषदेत म्हणाले होते. तसेच मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर तिखट शब्दांत टीकाही केली होती. या टीकेला खासदार बारणे यांनी जोरदार प्रतित्तर दिले आहे. तुमचा किंवा अजित पवार यांचा नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर विश्वास नाही का? तुम्ही कोणत्या विचारांनी महायुतीत आलात, याचेही उत्तरही आमदार शेळके यांनी देण्याची मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. सध्या महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या तीनही पक्षांनी मावळ लोकसभेवर आपल्या पक्षाचा दावा सांगितला आहे. संबंधित दाव्याला पुष्टी देणारी वक्तव्य व आरोप–प्रत्यारोप होत आहे. नऊ वर्षांत खासदार बारणे यांनी मावळसाठी कोणते प्रकल्प आणले आणि केंद्राकडून किती रुपयांचा निधी आणला हे जनतेला सांगावे, असे आवाहन केले. मी काय काम केले हे मी जनतेला सांगेल, कोणीतरी राजकीय द्वेषातून व सुडापोटी मला काय काम केले असे विचारणा करत असेल तर त्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही. माझी बांधिलकी माझ्या मतदारांशी आहे, असे प्रतित्तर खासदार बारणे यांनी दिले आहे.
याबाबत बोलताना खासदार बारणे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत मावळमधून महायुतीकडून माझ्या उमेदवारी बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या झालेल्या बैठकीत निर्णय झाला आहे. भाजपाच्या या दोन नेत्यांशिवाय निर्णय घेणारा अजून कोणी आहे असे मला वाटत नाही. राष्ट्रवादीला त्यांची ताकद वाढली आहे असे वाटत असेल तर त्यांनी खुशाल मागणी करावी, मागील काळात मी राष्ट्रवादीचा दोन लाख मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे 2024 साली महायुतीचा उमेदवार मीच असून विजयी देखील मीच होणार आहे. मी जनतेमध्ये राहून काम करणारा लोकप्रतिनिधी आहे. आमदार सुनील शेळके यांचे व माझे राजकीय किंवा वैयक्तिक कसलेच मतभेद नाही. पण त्यांनी माझ्यावर आरोप का केले, कोणी त्यांना बोलायला लावतंय का? हे बघावं लागेल, समक्ष भेटल्यावर मी त्यांना याबाबत विचारणा असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.
तळेगावदाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी एन.के.पाटील यांच्याकरिता दिवंगत किशोर आवरे यांनी शिफारस केली होती म्हणून मी पत्र दिले. हे मी आमदार शेळके यांना देखील सांगितले होते व त्यांची बदली करा म्हणून शेळके यांनी माझ्याकडे मागणी केल्यानंतर मी मुख्यमंत्री यांच्या कानावर विषय घालत बदलीसाठी पत्र देखील दिले आहे. ते पत्र आमदार शेळके यांनी देखील पाठविले आहे.
त्याच पद्धतीने उत्तर देणार
केवळ राजकीय आकसापोटी माझ्यावर आरोप केले जात असतील त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल. काही लोक राजकीय हेतूपोटी आरोप करत आहेत. विरोधी पक्षाला फायदा होईल, असे काही जणांच्या वक्तव्यावरून वाटते.