मुंबई – बंडखोरांनी 24 तासांत मुंबईत परत यावे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर भूमिका मांडावी. त्यांच्या मागणीवर विचार केला जाईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले. त्यामुळे बंड शमवण्यासाठी शिवसेना प्रसंगी महाविकास आघाडीबाहेर पडण्यास तयार असल्याचे चित्र समोर आले. साहजिकच, राऊत यांचे वक्तव्य कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दृष्टीने धक्कादायक ठरले. ते वक्तव्य कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटातील चिंता वाढवणारे आहे.
तसे असले तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी तूर्त तरी सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी त्यांची भूमिका मांडली. ती भूमिका राऊत यांच्या वक्तव्याशी साधर्म्य असणारी वाटत नाही. त्यामुळे ठाकरे घूमजाव करतील असे वाटत नाही, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. तर, राऊत जे बोलले तेच ठाकरे यांच्या मनात आहे का ते विचारू, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.