नवी दिल्ली – मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी राज्यातील आघाडी सरकारवर व विशेषत: शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. सध्याची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नाही, हे सरकार पडायलाच हवे असे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे सडके फळ आहे, ते पडायलाच हवे. हे आघाडी सरकार चुकीच्या पद्धतीने स्थापन झाले आहे. कारण कॉंग्रेस आणि शिवसेना कधीच एकत्र होऊ शकत नाही.
केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे हाच त्यांचा एकमेव हेतू होता, असे नमूद करून त्या म्हणाल्या की आताची शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना नसून ती कॉंग्रेसची बी टीम असलेली शिवसेना आहे. त्यामुळे हे सरकार पडायलाच हवे. कारण ते हिंदुविरोधी आणि महिलाविरोधी सरकार आहे. शिवसेनेने आपले नाव बदलून कॉंग्रेस सेना ठेवावे असा सल्लाही त्यांनी दिला.