मुंबई – भाजप विरोधात असलेल्या इंडिया आघाडीची सध्या देशभर चांगलीच चर्चा आहे. असं असलं तरी भविष्यातील निवडणुकांमध्ये ही आघाडी नेमकी कशी लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशात मुंबई येथील ग्रँण्ड हयात हॉटेलमध्ये पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये तीन महत्वाचे ठराव झाल्याचे समोर आले आहे.
भाजप विरोधात विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या इंडिया आघाडीने देशभरातील आगामी निवडणूक लक्षात घेता काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. मुंबईत पार पडलेल्या या आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेससह देशभरातील इतर स्थानिक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीवेळी बोलताना काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केल्याचं दिसून आलं.
राहुल गांधी म्हणाले की, “आम्ही दोन मोठ्या गोष्टी ठरविल्या आहेत. हा मंच 60 टक्के नागरिकांचं प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे भाजपला पुढची निवडणूक जिंकणं कठीण आहे. आम्ही समन्वय समिती स्थापन केलीय. त्या समितीतही काही समिती स्थापन केल्या आहेत. तर दुसरा निर्णय आम्ही लवकरच जागा वाटपाचा निर्णय घ्यायचा घेतलाय. मी हे विश्वासपूर्वक सांगू शकतो की, आम्ही सर्व विरोधक एकत्र आल्याने, भाजपचा विजय अशक्य आहे.
मी जेव्हा लडाख दौऱ्यावर होतो तेव्हा चीनने आमची जमीन बळाकावल्याचे येथील जनतेने मला सांगितले. लडाखमधील प्रत्येक व्यक्तीला हे माहित आहे. हा राष्ट्रीय महत्त्वाचा आणि सुरक्षिततेचा मुद्दा आहे. परंतु दुर्दैवाने मीडिया या घटनांची माहिती देत नाही, याची खंत आहे. असे देखील राहुल यावेळी म्हणाले.