मेढा – शरद पवार हे सर्वांचेच आदरणीय नेते आहेत. विचारांमध्ये मतभेद असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष एकच आहे. पक्ष संघटना, विकासात्मक धोरण, तालुक्यातील प्रलंबीत प्रश्न व कार्यकर्त्यांना पाठबळ मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचाराबरोबर राहण्याचा निर्णय माझ्यासह जावली -सातारा विधानसभा मतदार संघातील शरद पवार, अजित पवार, आमदार शशिकांत शिंदे यांना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मानणाऱ्या कार्यकत्यांनी घेतला आहे, असे जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती अमित कदम यांनी मेढा येथे स्पष्ट केले.
येथील शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील कार्यकर्त्यांची प्रथम बैठक झाली. या बैठकीमध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन श्री. कदम यांनी याबाबतची माहिती दिली. अजित पवार आणि माझे किती सख्य आहे हे संपूर्ण जिल्ह्याला ज्ञात आहे. त्यामुळे जावली तालुक्यातील सिंचनाचे रखडलेले प्रश्न पाठपुरावा करून मार्गी लावण्यासाठी निश्चितच प्रयत्न होतील. बोंडारवाडी धरण, महू- हातगेघर धरण, कण्हेर, कोयना धरण पुनर्वसन, घाट माथ्याचे रस्ते या सारखे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आग्रह धरू. कोयना विभागातील सोळशीचे धरण मार्गी लागत असेल तर बोंडारवाडीचा विषय ज्यांनी सुरू केला, त्यांनीच तो पूर्ण करावा अशीही आग्रही मागणी आमच्याडून अजित पवार यांच्याकडे राहील.
या वेळी वेण्णामाई पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पार्टे, जावली बॅंकेचे संचालक योगेश गोळे, प्रकाश कोकरे, साधू चिकणे, रवि शेलार, विलास दुंदळे, सुरेश दळवी, उपसरपंच प्रकाश कदम, संदीप पवार, सोमनाथ कदम, महेश कदम, प्रमोद पवार, विठ्ठल पवार, संतोष रांजणे, रोहीत रोकडे, अशोक गोळे, विश्वास धनावडे, भाईजान आतार, सुंदर भालेराव, जय शिंदे, शुभम महामुलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल
मेढा येथील मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचाच आमदार असेल असे सुचित करून श्री. कदम पुढे म्हणाले, “माझी काळजी करणारे अनेक हितचिंतक आहेत. आमच्या भुमिकेमुळे कोणाला आनंद होण्याचे काहीच कारण नाही. वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत. वरती काहीही निर्णय झाला तरी जावली तालुक्यात लोकसभा, विधानसभेसह सर्वच निवडणुका आमदार शशिकांत शिंदे यांनाच विचारात घेवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ताकतीने लढविणार आहे. मीही आमदार पुत्र आहे. माझे वडील स्व. जी. जी. अण्णांनी या मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. तर मी देखील पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गांवागावात पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. आता जावलीकरांना स्थानिक उमेदवार पाहिजे आणि ती संधी आता आली आहे, असेही अमित कदम यांनी सांगितले.