कल्याण – डोंबिवली – नरेंद्र मोदींची पंतप्रधान म्हणून मुंबईतील शेवटची सभा असून त्यानंतर मोदी हे पंतप्रधान राहणार नाहीत, 4 जून नंतर ते झोळी घेऊन निघून जातील, नंतर भाजपचे काय होणार? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला. तर गेल्या दहा वर्षांत मोदींनी झोप न घेतल्याने त्यांचा मेंदू आता क्षीण झाला आहे, असा घणाघातही ठाकरेंनी पंतप्रधानांवर केला आहे.
कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मोदी-शहांबरोबर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.
ठाकरे पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी मला नकली संतान म्हणतात, हे जनतेला मान्य आहे का?, एवढंच काय जे भाजपचे अस्सल लोक आहेत, त्यांना देखील हे पटते का? जे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये शिकले घडले, त्यांना देखील हे मान्य नाही. त्यांचे काय चालू आहे.
कधी काय बोलतील, हा त्यांचा त्यांना थांगपत्ता नाही. त्यांचे कसे चालू आहे. तळ्यात, मळ्यात अन् कोणाच्या तरी गळ्यात. एकदा नकली म्हणायचे अन् पुन्हा मला साद घालायची. कारण हा माणूस गेल्या दहा वर्षांत झोपलेला नाही.
आणि आपण जर दोन दिवस झोपलो नाही, तर मेंदूंला झिणझिण्या येतात. त्यामुळे या सरकारला मी गजनी सरकार म्हणतोय. त्यामुळे जनतेने या गजनी सरकारच्या हातात सरकार देऊ नये, असे आवाहन देखील ठाकरे यांनी केले.
शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल !
ठाकरेंनी पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील समाचार घेतला. ठाकरे म्हणाले की, चपरासी जरी झालो तरी ते म्हणतात मी पुन्हा येईल.
तर आपले मिंधे हे दिल्लीश्वराचे चाकरी करतात, दाढी खाजवत आहेत. हे बाळासाहेबांचे विचार आहेत का, हे नेभळट लोक आहेत. असाही हल्लाबोल त्यांनी केला.