सभापती श्रीधर किंद्रे यांचे आंबवडे खोऱ्यातील जनतेला आश्वासन
भोर -पुणे जिल्हा परिषद आणि भोर तालुका पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहेच आणि राज्यातही महाआघाडीचे सरकार असल्याने सत्तेचा वापर जनतेचे प्रश्न मार्गी लावून विकासकामे करणार असल्याचे आश्वासन भोर तालुका पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे यांनी दिले.
ऊत्रौली, कारी गटातील वडतुंबी, टिटेघर, कोर्ले, गावांच्या वतीने नवनिर्वाचीत सभापती श्रीधर किंद्रे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, भोर तालुका पंचायत समितीच्या उपसभापती दमयंती जाधव यांचा सत्कार समारंभ टिटेघर (ता. भोर) येथे आयोजित केला होता, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना श्रीधर किंद्रे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे बबनराव साळेकर, संतोष केळकर, शंकर तावरे, नथू साळेकर, मारुती चिकणे, मोहन बांदल, वाठार ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप खाटपे, वडगांवचे उपसरपंच सोमनाथ डाळ, आदींसह ऊत्रौली गणातील कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी पुढे बोलताना श्रीधर किंद्रे म्हणाले, राष्ट्रवादीने दिलेल्या सभापती पदाची संधी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सार्थकी लावून पंचायत समिती वा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून या भागाचा सर्वांगीण विकास करणार आहे. याबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून सर्व योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवल्या जातील असे त्यांनी जाहीर केले. यावेळी रणजीत शिवतरे यांनी भोर-वेल्ह्यासह जिल्ह्यातील विकासकामांना निधी कमी पडून देणार नाही, सांगितले. ग्रामस्थांनी यावेळी श्रीधर किंद्रे, रणजीत शिवतरे व दमयंती जाधव यांचा नागरी सत्कार करुन भविष्य कालासाठी शुभेच्छा दिल्या.