मुंबई – मुंबईसह राज्यात दररोज करोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढतच आहे. यामुळे राज्य सरकारने अनेक भागात पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. पण रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. राज्यात आज आठ हजार 807 नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे ही करोनाची दुसरी लाट असल्याची चर्चा केली जात आहे. यासंदर्भात कोव्हिड टास्क फोर्समधील डॉक्टरांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी म्हंटले कि, क्रिटीकल केसेस आणि मृत्यूचे प्रमाण मागील ७ ते १४ दिवसांमध्ये रुग्णवाढ झाल्यानंतर वाढले आहे. पुढील १० दिवसांमध्ये मुंबईमधील करोना परिस्थिती भविष्यात कशी असेल यासंदर्भातील अंदाज बांधता येईल, असे सांगितले आहे.
तर, टास्क फोर्समधील सदस्य असणाऱ्या डॉक्टर शशांक जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 10 दिवसांमध्ये राज्यामध्ये करोनाची दुसरी लाट येणार की नाही हे ठरेल. करोना रुग्णांची वाढ यंदा विदर्भामधून सुरु झाली आहे. यामुळे रुग्णवाढीमध्ये नवीन करोना विषाणूंचा स्ट्रेनचा सहभाग नसेल असे म्हणता येणार नाही, अशी प्रतिक्रिया जोशी यांनी दिली आहे.
दरम्यान, राज्यात आज करोनामुळे 80 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या महाराष्ट्रातील मृत्यूदर 2.45 टक्के एवढा आहे. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.70 टक्के एवढे आहे. राज्यात सध्या 2 लाख 95 हजार 578 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. 2,446 जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात अजून 59 हजार 358 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज 2 हजार 772 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत 20 लाख 8 हजार 623 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.