मुंबई : राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन होणार का? असा सवाल प्रत्येकाच्या मनात आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. राजेश टोपे म्हणाले की, लॉकडाऊनबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. याबाबत चर्चा सुरू असते. कडक निर्बंधांबाबत शासन पाऊल उचलेल. लोकांनी गर्दी टाळावी हा दृष्टीकोन आहे. गर्दी होणाऱ्या ठिकाणांमध्ये कडक निर्बंध आणत आहोत, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
औरंगाबामध्ये काल झालेल्या गर्दीबाबत बोलताना टोपे म्हणाले की, अशी गर्दी करणे हे परवडणारे नाही. अशी गर्दी होत कामा नये. खासदार इम्तियाज जलील भान ठेवतील अपेक्षा आहे. टोपे म्हणाले की, शरद पवार यांना पोटात दुखत असल्यामुळे एडमिट केलं आहे. पोट दुखण्याचे कारण पित्तनलिकेच्या मुखाशी खडा निर्माण झाला होता, त्यामुळे त्रास होत होता. एंडोस्कोपीने तो खडा काढला आहे. अजून एक शस्त्रक्रिया करायची आहे. आता ते स्टेबल होत आहेत. चार ते पाच दिवसाने डिस्चार्ज करता येईल.
कोरोना संसर्ग होऊन बाधित रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. यातच मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या काहीशी वाढलेली दिसली. त्यामुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढच्या अडचणींमध्ये वाढताना दिसत आहेत. रविवार आणि सोमवारच्या तुलनेत महाराष्ट्रात मंगळवारी नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काहीसा कमी दिसून आला. पण, 27,918 इतकी नव्या कोरोनाबाधितांची नोंदही धडकी भरवणारी ठरली.
राज्याच्या आरोग्यविभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी कोरोनामुळे 139 जण दगावले. कोरोनातून सावरणाऱ्यांचा आकडाही राज्यात मोठा असला तरीही या दुसऱ्या लाटेमध्ये नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण मात्र अडचणीत आणणार ठरत आहे.