पिंपरी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदारसंघावरून महायुती मधील घटक पक्षांमध्ये अदलाबदल करिता अंतर्गत हालचाली सुरू आहेत. शिवसेनेचे विद्यमान खासदार असलेल्या मावळवर राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपही दावा सांगत आहे. अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मावळसाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचे सांगितले.
भाजपच्या एका शिष्टमंडळाने दिल्ली दरबारी जाऊन मावळ भाजपसाठी कसा अनुकूल आहे हे पटवून सांगितल्याच्या चर्चा आहेत. महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीत यावर चर्चा होणार असली तरी अंतिम निर्णय दिल्ली घेणार आहे. त्यामुळे मावळवरून महायुतीत तिढा वाढणार का आणि यंदाच्या निवडणुकीत नवीन चेहरा देणार का या चर्चांना उधान आले आहे.
मतदारसंघाच्या निर्मितीपासून मावळवर मागील १५ वर्षे शिवसेनेचे वर्चस्व राहिले. सुरुवातीला दिवंगत नेते गजानन बाबर यांनी प्रतिनिधित्व केले. त्यानंतर सलग दोन वेळा बारणे प्रतिनिधित्व करत आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर परिस्थिती बदलली आहे. खासदार बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असले, तरी मावळच्या जागेवर भाजप, अजित पवार गटाकडून सातत्याने दावा केला जात आहे.
तर पिंपरी व मावळ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून पिंपरी चिंचवड शहरात पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. रायगडमधील तिन्ही विधानसभा मतदारसंघात पक्षाची चांगली पकड असल्याचे सांगत राष्ट्रवादीकडून दावा केला जात आहे. तर चिंचवड, पनवेल, मावळ या विधानसभा मतदारसंघात भाजपचा मतदारवर्ग मोठा असल्याचे सांगण्यात येत आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, उरण आणि पनवेल असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. सध्याचे पक्षीय बलाबल पाहता याठिकाणी भाजपचे दोन अधिक भाजपला संलग्न असणारे अपक्ष एक, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे दोन तर शिवसेना शिंदे गटाचा एक आमदार आहे.
मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही मावळ साठी आग्रही भूमिका मांडली. तर भाजपकडून पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी मंत्री बाळा भेगडे, लोणावळ्याच्या मा. नगराध्यक्ष सुरेखा जाधव हेही इच्छुक आहेत.
पिंपरी चिंचवड शहर भाजपातील एक शिष्ट मंडळ दिल्लीला जाऊन मतदारसंघ भाजपला हवा तसेच भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यासाठी आग्रही असल्याचे दिसले. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपच्या आग्रही भूमिकेमुळे मावळवरून महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत आपली उमेदवारी निश्चित झाली असल्याचे सांगत प्रचाराला लागले आहेत.
या मतदारसंघातील सहा विधानसभेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची ताकद मोठी आहे. केवळ एकमेव आमदार असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हा मतदारसंघ सोडण्याची रिस्क भाजपचे केंद्रीय कार्यकारणी घेईल का? भाजप नेहमी मतदारांचे कॅल्क्युलेशन करूनच उमेदवारी देत असतो.
भाजपची कार्यशैली पाहता धक्का देत अचानक नवीन चेहरा समोर आणला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर पुन्हा कोलांट उड्या पाहायला मिळतील. अशी चर्चा आहे. त्यामुळेच महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीने अद्याप मावळसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही.