Bihar Politics : बिहारमध्ये आज नितीशकुमार सरकारची फ्लोर टेस्ट होणार आहे. नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा बिहारमध्ये भाजपासोबत नवं सरकार स्थापन केले आहे. विश्वासदर्शक ठरावाला सामोरी जाण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून ‘गेम’ खेळला जात असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापले आहे.
एनडीएकडे एकूण 128 आमदार आहेत. यापैकी 78 भाजपचे, 45 जेडीयू, 4 एचएएम आणि एक अपक्ष आमदार आहे. दुसरीकडे, महाआघाडीकडे केवळ 114 आमदार आहेत. यामध्ये आरजेडीचे 79, काँग्रेसचे 19 आणि डाव्या पक्षांचे 16 आमदार आहेत. आरजेडी जेडीयूच्या आमदारांमध्ये फूट पडल्याचा दावा करत आहे, तर जेडीयूला मात्र त्यांच्याकडे बहुमत असल्याचा विश्वास आहे.
सरकारच्या त्या शक्तिपरीक्षेवेळी काही आमदार सत्ताधारी गोटाच्या बाजूने मतदान करू शकतात, अशी धास्ती विरोधकांना वाटत आहे. विशेष म्हणजे रविवारी संध्याकाळी झालेल्या आमदारांच्या बैठकीला जेडीयूचे चार आमदार उपस्थित नव्हते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
तेजस्वी यादव यांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त
खबरदारीचा उपाय म्हणून राजदच्या आमदारांना माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यांच्या बंगल्यात मुक्कामासाठी पाचारण करण्यात आल्याचे समजते. बिहारमधील नव्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावामुळे एकीकडे जेडीयूच्या आमदारांना पाटणा येथील हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे, तर दुसरीकडे आरजेडीचे तेजस्वी यादव यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कसे आहे आकड्यांचे गणित ?
बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत. येथे बहुमताचा आकडा 122 आहे. सध्या एनडीएकडे 128 आमदार आहेत. यापैकी भाजपकडे 78 जागा, जेडीयूकडे 45 जागा, हिंदुस्थानी अवाम मोर्चा (एचएएम) 4 जागा आणि एक अपक्ष आमदार सुमित सिंह देखील आहेत. तर विरोधी पक्षांबद्दल बोलायचे झाले तर राजदचे 79, काँग्रेसचे 19, सीपीआय (एमएल) 12, माकपचे 2, सीपीआयचे 2 आमदार आहेत. अशा प्रकारे विरोधकांकडे एकूण 114 आमदार आहेत.