शिक्षण आयुक्तांकडून शिक्षण विभाग मुख्य सचिवांना अहवाल
पुणे – हिवाळ्यात सकाळच्या शाळा डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत सकाळी 7.30 वाजल्यानंतरच भरवाव्यात, असे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांचे म्हणणे आहे. या संचालकांचे अभिप्राय विचारात घेऊन योग्य ते आदेश निर्गमित करावेत, असा अहवाल पुण्यातील शिक्षण आयुक्तांनी शालेय शिक्षण विभागाच्या मुख्य सचिवांना पाठविला आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसांत शाळा भरण्याच्या वेळेत बदल होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने थंडीच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे दृष्टिकोनातून शाळेच्या वेळेमध्ये बदल करण्याबाबत निवेदनाद्वारे शिक्षण विभागाकडे मागणी केली आहे. अन्य राज्यांमध्ये प्रशासनाकडून वेळोवेळी हिवाळी ऋतू लक्षात घेता कायमस्वरूपी सर्व शाळांमध्ये बदल करण्यात येतो. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही हिवाळ्यात तसा प्राथमिक, माध्यमिक व इतर शाळांमध्ये शालेय वेळेत कायमस्वरूपी बदल करण्याची कार्यवाहीची मागणी “मनविसे’चे जिल्हाध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली.
या मागणीचा संदर्भ घेत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी शालेय शिक्षण अपर मुख्य सचिवांना शाळेच्या वेळेत बदल करण्यासाठी योग्य तो धोरणात्मक निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव पाठविला आहे. तसेच शाळेच्या वेळेसंदर्भात यापूर्वीच राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांनी अभिप्राय कळविले आहेत. त्यांनी हिवाळ्यात सकाळच्या शाळा थंडीच्या दिवसांत सकाळी 7.30 वाजण्याच्या अगोदर भरत असल्यास मुलांना एक तास अगोदर घर सोडावे लागते. त्यावेळी अंधार असतो. त्यामुळे हिवाळ्यात सकाळच्या शाळा 7.30 नंतर भरवाव्यात, असा अभिप्राय दिला आहे.
अंमलबजावणी होणार का?
माध्यमिक शाळा संहितेमधील नियम क्रमांक 54.2 मध्ये उल्लेख केल्यानुसार कडक उन्हाळ्याच्या महिन्यात शाळेचे कामाचे तास सकाळी सहा तासांपेक्षा कमी ठेवता येतील. मात्र, शिकविण्याचे तास दररोज चार तासांहून कमी असू नये, अशी तरतूद आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शाळेच्या वेळेत बदल होण्यासाठी शासनाकडून धोरणात्मक निर्णयाची गरज आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी होणार का, हेच आता पाहावे लागेल.