श्रीगोंदा – कुकडी पाणी वाटपच्या नियोजनात बबनराव पाचपुतेंनी हस्तक्षेप केल्याने शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळाले नाही. आता ते म्हणतात, कुकडीचा सुधारित आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळविली. डिंभे, माणिकडोह, बोगदा मी मार्गी लावला. मग आमदार असताना झोपा काढल्या का? तुम्ही आता कोणत्याही पक्षाचे चिन्ह घ्या, तुम्हाला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जगताप कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप यांनी दिला.
कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी कारखाना कार्यस्थळावर झाली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून आ. जगताप बोलत होते. यावेळी भाऊसाहेब शिंदे, बाबासाहेब सरोदे, बाळासाहेब शेलार, बंडू कातोरे, गणेश बेरड, दिलीप गायकवाड, शंकर धारकर यांची भाषणे झाली. दत्तात्रय पानसरे, मनोहर पोटे, बाळासाहेब शेलार, बाळासाहेब उगले, अनिल वीर, सुरेश लोखंडे आदी उपस्थित होते.
आ. जगताप म्हणाले, कारखान्याने एफआरपीपेक्षा 500 रुपये जादा भाव दिला. त्यामुळे केंद्र शासनाने कारखान्यास 30 टक्के कर भरावा, अशी नोटीस बजावली आहे. तरी कारखाना सभासदांची दिवाळी गोड करणार आहे. आघाडीचे सरकार असताना मी “सह्याजीराव’ होतो, असे पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत म्हटले होते. मग त्यांनी कोट्यवधी रुपयांची माया कशी जमविली. यावेळी सह्याजीरावांनी सह्या फक्त स्वत:च्या विकासासाठी केल्या का? अशी टिकाही जगताप यांनी यावेळी केली.
जेष्ठ नेते बाबासाहेब भोस म्हणाले, नागवडे,जगताप कारखान्यासारख्या सहकारी संस्था सुरळीतपणे चालणे महत्वाचे आहे. या संस्था सुरळीत चालण्यासाठी या संस्थांमध्ये राजकारण बाजूला ठेवावे. या संस्था सुरळीतपणे चालण्यासाठी आम्ही सदैव पाठीशी राहू. कुकडीच्या पाण्यात राजकीय हस्तक्षेप थांबला तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल यासाठी लक्ष घालावे.
माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंधरकर म्हणाले, नागवडे कारखान्याशी तुलना करता जगताप कारखान्याचा साखर उत्पादन खर्च अधिक आहे. पिंपळगावचे ऊस नेऊन माळेगाव साखर कारखान्याने 3 हजार 200 रुपये भाव दिला आपण किती भाव दिली. यावर आत्मचिंतन करावे. कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. एन. मरकड यांनी अहवाल वाचन केले. नारायण शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.