चांगल्या कामाला विरोध करणाऱ्यांना देवसुद्धा माफ करणार नाही
कोपरगाव – कोपरगाव शहरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागते. 15 दिवस ते 21 दिवसांनी पिण्यासाठी पाणी मिळते. जास्त दिवस साठलेल्या पाण्यामुळे पाणी दूषित होवून रोगराई वाढली असून कोपरगावकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला. लोकप्रतिनिधी म्हणून निळवंडे धरणातील स्वच्छ पाणी बंद पाईपद्वारे कोपरगावकरांना पिण्यासाठी मिळावे, यासाठी प्रयत्न करीत असताना कोपरगावच्या काही लोकांनी विरोध करणे हे दुर्दैव आहे. असे मत आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केले.
निळवंडेचे पाणी मिळू नये यामागे मोठे षड्यंत्र आहे. पाण्यासारख्या पवित्र आणि पुण्याच्या कामाला विरोध करणाऱ्यांना देव सुद्धा माफ करणार नाही. शहरातील लोकांचे मते घेवून योजनेला विरोध करायचे. चालून आलेली पाण्याची सुवर्णसंधी घालवायची ही कूटनीती विरोधकांची आहे. मात्र, जेव्हा निळवंडेची पाणी योजना कोपरगावसाठी पूर्णत्वास येईल तेव्हाच माझी आमदारकी सार्थक झाली असं मी समजेल,असे त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या.
यावेळी त्यांचे छोटे पुत्र ईशांत कोल्हे, नगरसेविका विद्या सोनवणे, सुवर्णा सोनवणे, पप्पू पडियार, रंजन जाधव, विवेक सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते होते. त्या पुढे म्हणाल्या, तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विविध विकास कामे केली. अनेक वर्षे प्रलंबित असणारे कामे पूर्णत्वास येत आहेत. तालुक्याचा विकास प्रगतीपथावर असताना शहराच्या महत्त्वाच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला जाणून – बुजून विरोध केला. मी बोलत नाही तर मतदारसंघांमधील माझी काम बोलत आहेत.
लोकनियुक्त नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाना साधताना त्या म्हणाल्या की, शहरविकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी गेल्या वर्षभरापासून पडून आहे. मात्र त्यांच्याकडून आलेल्या निधीतून कामे पूर्ण होत नाहीत. शहराच्या बंदिस्त नाट्यगृहासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर करून आणला, परंतु तो एक वर्षापासून तसाच पडून आहेत. पैसे पडून राहू नये म्हणूनच रस्ते विकासासाठी आलेला दोन कोटीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळवून रस्ते पूर्णत्वास आणले. तेही त्यांच्या पोटात दुखत आहे. शहरात बाजारओठे, नगरपालिका इमारत, सार्वजनिक वाचनालय इमारत, विशेष रस्ता अनुदान, पंतप्रधान आवास योजना, शहर हद्दवाढ प्रश्न अशा विविध प्रकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. आलेल्या निधीचा वापर सुद्धा नीट करून घेता येत नाही.
पालिकेला इतका मोठा पैसा गोळा करूनही आमच्या नावाने बोंब मारतात.विरोधक स्वतः काही काम करीत नाहीत, परंतु मी आमदार म्हणून चांगले काम केले तर का केली म्हणून ओरडतात. नाही केली तर का केली नाही म्हणून ओरडतात अशी स्थिती सध्या कोपरगावच्या विरोधकांची झाली आहे, असा टोला विरोधकांना लगावला. निळवंडेच्या पाणीप्रश्नासाठी जाणीवपूर्वक विरोध केला जात आहे. पण मी निळवंडेचे पाणी मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आमदार म्हणून त्यांनी मतदारसंघांमध्ये केलेल्या विकास कामावर चर्चा केली मात्र पुढील राजकीय निवडणुकीचे रणनिती आणि उमेदवारी यासंदर्भातले कोणतेही वक्तव्य करण्यास त्यांनी टाळले.