कार्यकर्त्यांना त्रास झाला तर याद राखा; पिचडांना सुनावले
अकोले – निळवंडे, पिंपळगाव खांड, आंबित, बलठण, पाडोशी यासह छोटे-मोठे प्रकल्प, उच्चस्तरीय कालवे, पिंपरकणे उड्डाणपूल आदी कामांना न्याय देऊन अकोले तालुक्याच्या सामान्य जनतेचे हित साधले. त्यांना जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक व इतरही संस्थांमध्ये पदे दिली.सातत्याने विकासकामांच्या बाबत सहकार्य करूनही त्यांनी मात्र राष्ट्रीय नेते शरद पवार यांना सोडण्याचे पाप केले. काळी बाजू झाकण्यासाठी त्यांनी आपल्या लेकालाही भाजपमध्ये धाडले आहे, अशी खरमरीत टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिचड पितापुत्रांचे नाव न घेता अकोले येथे जाहीर केली.
अकोले येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसची आज दुपारी जाहीर सभा झाली. त्यावेळी पवार बोलत होते. या सभेमध्ये डॉ. किरण लहामटे, सुनीता भांगरे, अमित भांगरे, यमाजी लहामटे, एम. एम. लांघी, काशिनाथ साबळे, कॉंग्रेसचे विनोद हांडे आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अध्यक्षस्थानी निवृत्त गटविकास अधिकारी भानुदास तिकांडे होते. यावेळी अंकुश काकडे, राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, घनश्याम शेलार, अविनाश आदिक, कपिल पवार, अशोकराव भांगरे, दशरथ सावंत, रंगनाथ पाटील वाकचौरे आदी उपस्थित होते.
पवार यांनी आपल्या खास रोख ठोक शैलीमध्ये पिचड यांचे नाव न घेता नेमकेपणाने टीकास्त्र सोडले. ‘ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी’, असा दम देऊन आमच्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तर याद राखा अशी तंबी पिचड पिता-पुत्रांच्या बरोबर इतरांना देऊन आपल्याही कार्यकर्त्यांनी कायदा, नियम व संविधानाचे पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले. वैभव पिचड यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका करताना काळा चष्मा घातलेले आता मात्र काळी बाजू झाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेले. कुंकू बदलू नका, बेडुक उड्या मारू नका. आणि त्यांचे नाव घेवून मोठे त्यांना करू नका. असा कार्यकर्त्यांना सल्ला देऊन त्यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले आणि पक्ष सत्तेवर आल्यानंतर भोजदरावाडी येथे एमआयडीसी सुरू केली जाईल. आपले एकी ठेवा आणि समोरच्या व्यक्तीच्या नाटक्या प्रवृत्तीला भुलूर नका, असे त्यांनी अशोकराव भांगरे, डॉ लहामटे, सतीश भांगरे, मधुकर तळपाडे, मारुती मेंगाळ व इतरांना आवाहन केले.
भांगरे यांनी मंत्री विखे पाटील यांच्यावर हल्ला बोल करून ‘छत्रीवाले’ अशी संभावना केली. त्यांना अकोल्याचे पाणी शिर्डीला पळवून न्यायचे आहे असा आरोप केला. बारा-0 ची भाषा करणाऱ्यांनी किमान सहा जागांवर विजय मिळून दाखवावा. अशाप्रकारचा टोला लगावला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी यावेळी पिचड यांच्या चाळीस वर्षाच्या राजकारणावर ‘करंटे राजकारण’ म्हणून शरसंधान सोडले. जातीवादाकडे झुकण्याचे महापाप म्हातारपणी पिचड यांनी केल्याची बोचरी टीका केली. आता यापुढची लढाई निर्णयक होणार असून “गद्दारी विरुद्ध सामान्य जनता’ ही अशी लढाई राहणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुद्ध भाजप हा लढा त्यापुढे फिका ठरेल असा त्यांनी इशारा दिला.