नवी दिल्ली -कॉंग्रेस नेते राहुल गांधी कर्नाटकमधून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. डावे पक्ष नाराज होऊ नयेत यासाठी राहुल केरळमधील मतदारसंघ बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राहुल मागील वेळी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्या राज्यात डाव्या पक्षांची सत्ता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात ताकदीने लढण्यासाठी विरोधी पक्षांनी इंडिया या देशव्यापी आघाडीची स्थापना केली आहे. त्या आघाडीत कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांचाही समावेश आहे. त्यामुळे यावेळी केरळमधील राजकीय समीकरणे लोकसभा निवडणुकीत बदललेली दिसतील. त्या निवडणुकीला कॉंग्रेस आणि डावे मित्रपक्ष म्हणून सामोरे जातील. त्याकडे लक्ष वेधून डाव्या पक्षांनी राहुल यांनी केरळमधून लढू नये अशी भूमिका घेतली आहे. राहुल यांनी भाजपचे प्रमुख आव्हान असणाऱ्या राज्यातून निवडणूक लढवावी, असे डाव्यांचे म्हणणे आहे. त्यातून त्यांनी कर्नाटकचाही पर्याय सुचवला आहे.
आता कॉंग्रेसच्या गोटातूनही राहुल यांनी कर्नाटकमधून रिंगणात उतरण्याच्या पर्यायाची चाचपणी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. काही महिन्यांपूर्वी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये भाजपला पराभूत करून कॉंग्रेसने सत्ता हस्तगत केली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात चांगली कामगिरी होण्याचा विश्वास कॉंग्रेसला वाटत आहे. अशात राहुल स्वत: कर्नाटकमधून लढल्यास ती बाब पक्षासाठी उपयुक्तच ठरेल, असे कॉंग्रेसजनांना वाटत आहे. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत.
त्यातील तब्बल २५ जागा मागील वेळी भाजपने खिशात घातल्या. कॉंग्रेस, जेडीएस आणि अपक्षाला प्रत्येकी १ जागा मिळाली. आगामी निवडणुकीसाठी भाजप आणि जेडीएस एकत्र आले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसपुढील आव्हान आणखी खडतर बनण्याची चिन्हे आहेत. त्याचा विचार करून राहुल यांनी कर्नाटकमधूनच लढावे असा प्रयत्न कॉंग्रेसमधून होणार असल्याचे सूचित होत आहे.