वृक्षप्रेमींचा सवाल : वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
पिंपरी – शहरात सातत्याने बेकायदेशीर वृक्षतोड होत आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण झाड छाटून केवळ बुंधेच ठेवण्यात आले आहेत. अशा तोडलेल्या झाडांच्या बुंध्यामधून पालिका ऑक्सिजन निर्मिती करणार आहे का? असा प्रश्न शहरातील वृक्षप्रेमींनी उपस्थित केला आहे. तसेच बेकायदा वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही केली आहे.
शहरातील विविध पर्यावरण प्रेमी संस्थांनी एकत्र येत याबाबत पालिका उपायुक्त सुभाष इंगळे यांना निवेदन दिल. निवेदनात म्हटले आहे की, प्राधिकरण, मोशी अशा भागात बेकायदेशीरपणे वृक्षांची तोड केली जात आहे. साईन बोर्ड, होर्डिंगसमोर येणाऱ्या फांद्या तोडल्या जात आहेत. अशा प्रकारे पर्यावरणास नुकसान पोहोचविणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच झाडांवर लावलेले खिळे, जाहिराती तात्काळ काढून टाकण्यात याव्यात आणि झाडांवर जाहिराती लावणा-यांवर कारवाई करावी.
एनजीटीच्या आदेशानुसार झाडाच्या एक मीटर परिघातील कॉंक्रिटचे थर, ब्लॉक काढावेत. सार्वजनिक नोटीस बजावून, सोशल मीडियाचा वापर करून बेकायदेशीर झाडे तोडण्याच्या विषयावर जनजागृती करावी. कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस पाठवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
देवराई फौंडेशन आणि सावरकर मंडळाचे धनंजय शेंडबाळे, सिटीझन एरिया सभाचे रवी सिन्हा, आंघोळीची गोळी आणि रोटरी क्लब वाल्हेकरवाडीचे सचिन काळभोर, गणेश बोरा, खिळेमुक्त झाडेचे राहुल धनवे, प्रशांत राऊळ, निसर्गराजाचे राहुल घोलप, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचे तुषार शिंदे उपस्थित होते.