पाचगणी, (प्रतिनिधी) – महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटनस्थळांच्या निसर्गसंपदेला वणव्यांच्या धोक्याची समस्या आहे. वृक्ष, वेली आणि निसर्गावरच आपल्या सर्वांचे जीवन आणि आरोग्य अवलंबून आहे. ‘आय लव्ह पाचगणी अँड रिजन’च्यावतीने राबवण्यात येत असलेल्या ‘वणवामुक्त पाचगणी’ अभियानाला सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन सौ. दमयंतीराजे भोसले यांनी केले.
‘वणवामुक्त पाचगणी’ अभियानांतर्गत नुकत्याच झालेल्या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. वनाधिकारी गणेश महांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, बेल एअरचे संचालक फादर टॉमी, ‘आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल’ समितीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, विठ्ठल गोळे, जयवंत चौधरी, अमीन हाजी, किरण पवार, भारत पुरोहित, राजेंद्र भगत, सुनील कांबळे, भूषण बोधे, सुनील धनावडे, संजय आंब्राळे, प्रशांत डोंगरे, काकडे, भिलारे, निहाल बागवान व नागरिक उपस्थित होते.
गणेश महांगडे म्हणाले, वणव्यांचे दोन प्रकार आहेत. उष्णतेच्या विभागांमध्ये दोन झाडांचे घर्षण झाल्याने नैसर्गिकरित्या वणवे लागतात, तर गैरसमजातून, मशागतीसाठी आणि रोष व्यक्त करण्यासाठी माणसांकडून वणवे लावले जातात. वणवे रोखण्याची जबाबदारी फक्त वन विभागाची नसून, सर्वांची आहे.
दिलीप पवार म्हणाले, वणवे रोखणे आणि इतर समस्यांसाठी पोलिसांची ‘डायल 101’ आणि ग्रामसुरक्षा यंत्रणा उपयुक्त आहेत. शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. जयवंत भिलारे यांनी सूत्रसंचालन केले.
अजय सणस यांची आठवण
वणवा लागल्याचे समजताच, तो विझवण्यासाठी जीवाची पर्वा न करता धावून जाणार्या अजय सणस या दिवंगत युवकाची आठवण विठ्ठल गोळे यांनी जागवली. काळाने त्याला आपल्यातून लवकर नेले. त्याच्या चांगल्या कामाची आठवण आजही येते, असे ते म्हणाले.