मुंबई – पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. सचिन वाझे यांच्या निलंबनानंतर झालेल्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांच्याकडील गृहखातं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्यानंतर अनिल देशमुख यांच्या रुपाने महाविकास आघाडीची दुसरी विकेट पडणार, या चर्चांना उधाण आलं आहे.
पूजा चव्हाण ते सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांना अपयश आल्याने त्यांना गृहमंत्रीपदावरून हटवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशमुख यांना हटवून त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
दरम्यान गृहमंत्री बदलण्याऐवजी मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे राज्याला नवा गृहमंत्री मिळणार की मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी होणार ? हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. मात्र देशमुख यांना मंत्रीपदाचा दीर्घ अनुभव आहे. मात्र आघाडीचं सरकार चालवताना दिरंगाई होतेच. त्यामुळे त्यांचं मंत्रीपद जाईल, याची शक्यता कमी असल्याचं जाणकारांचं म्हणण आहे.