मुद्रांक शुल्क कपातीचे विकासकांकडून स्वागत
नवी दिल्ली – महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन घर विक्रीवरील मुद्रांक शुल्कात कपात केली आहे. यामुळे कुंपणावर बसून असलेले ग्राहक घर खरेदीचा निर्णय घेतील, असे विकासकांना वाटते.
महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे तयार घरे खरेदी करण्याचे प्रमाण वाढेल. मात्र, बांधकाम सुरू असलेल्या घरांच्या खरेदीकडे ग्राहक दुर्लक्ष करतील. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने अतिशय काळजीपूर्वक निर्णय घेतला आहे. ही सवलत मर्यादित काळासाठी देण्यात आलेली आहे. त्यामुळे या मर्यादित काळात या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ग्राहक खरेदीचे व्यवहार करण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर सणासुदीच्या काळात महाराष्ट्र सरकारने ही योजना जाहीर केल्यामुळे तयार घरांच्या खरेदीचे प्रमाण वाढेल, असे एम्बेसी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक जितू वीरवाणी यांनी सांगितले. टाटा रिऍल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय दत्त म्हणाले की, केवळ महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेऊन उपयोग नाही. इतर राज्यांनी महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे अनुकरण करण्याची गरज आहे. विशेषतः गुजरात, हरियाणा, दिल्ली, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यातील सरकारने असे निर्णय घेतले तर देशातील रिऍल्टी क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता खुली होईल.
पहिले घर घेणाऱ्यांना चालना
महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे पहिले घर घेणाऱ्यांना मदत मिळणार आहे. विशेषत: स्वस्त घरासाठी या योजनेचा लाभ होऊ शकतो. शिवाय ही योजना मर्यादित काळात असल्यामुळे ग्राहकांना पटकन निर्णय घ्यावा लागणार आहे, असे महिंद्रा लाइफस्पेसेस या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद सुब्रमण्यन यांनी सांगितले. सध्या व्याजदरही कमी आहेत आणि मुद्रांक शुल्क कमी झाल्यामुळे घर खरेदीसाठी ग्राहकांना महाराष्ट्रात उपयुक्त काळ आहे.