पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- राज्य सरकारने १९८० ते २०२० या कालवधीत दस्तनोंदणीवर मुद्रांक शुल्क कमी भरलेल्यांसाठी अभय योजना आणली आहे. या योजनेचा पहिला टप्पा दि.29 फेब्रुवारी रोजी समाप्त झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील योजना सुरू झाली आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी दिली. दरम्यान, पहिल्या टप्प्यात मुद्रांक शुल्क आणि दंडाच्या रकमेत जी सूट देण्यात आली होती. ती दुसऱ्या टप्प्यातील योजनेत कमी करण्यात आली आहे.
सन १९८० ते २०२० या कालवधीत सदनिका घेतली असेल. परंतु मुद्रांक शुल्क कमी भरले असेल, अथवा १० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विक्री करारनामा केला, मात्र रजिस्टर करण्यासाठी दाखल केले नाही अथवा बाजारभाव विचारात न घेता दस्तामध्ये जी रक्कम दाखविली, त्या रकमेवरच मुद्रांक शुल्क भरले असले अशा नागरिकांसाठी राज्य सरकारने अभय योजना जाहीर केली आहे.
त्यामध्ये १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २००० या कालावधीसाठी एक आणि १ जानेवारी २००१ ते २०२० या कालावधीतील दस्तांसाठी असे दोन गट तयार करण्यात आले आहेत. दि. १ डिसेंबर ३१ जानेवारी २०२४ आणि १ फेब्रुवारी 2024 ते ३१ मार्च २०२४ अशा 2 टप्प्यांत ही योजना राबविण्यात येणार आहे.
योजनेत राज्य सरकारकडून सवलतींचा वर्षाव करण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील योजनेला २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. तीन दिवसांपूर्वी ही मुदत संपुष्टात आली. या मुदतीत ३ हजार ६० नागरिकांनी अर्ज केला होता.