पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुद्रांक शुल्क न भरलेल्या अथवा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या प्रकरणात नागरिकांना दिलासा देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने अभय योजना आणली आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, अडीच महिन्यांत राज्यात 21 हजार 903 प्रकरणांमधून तब्बल 107 कोटींचा महसूल जमा झाला आहे, अशी माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाचे सहमहानिरीक्षक नंदकुमार काटकर यांनी दिली.
राज्य शासनाने दि.1 डिसेंबर पासून अभय योजना लागू केली. त्यामध्ये दोन टप्पे करण्यात आले आहे. पहिला टप्पा दि.1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 असा करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात मुद्रांक शुल्क आणि दंडामध्ये जादा सवलत असल्याने या पहिल्या टप्प्यास मुदतवाढ देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने दि.29 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ घेण्यासाठी पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर प्रकरणे नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालयात दाखल होत आहे.
या योजनेचा दुसरा टप्पा दि.31 मार्च 2024 पर्यंत आहे. राज्यातील 43 मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात मागील अडीच महिन्यात एकूण 39 हजार 122 प्रकरणे दाखल झाली आहेत. यातील 21 हजार 903 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. यातून शासनाला 107 कोटी रुपयांचा महसुल मिळाला आहे. तर उर्वरित 17 हजार 219 प्रकरणांवर कार्यवाही करण्यात येत आहे.
दरम्यान, पुणे शहर मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात एकूण 2 हजार 420 प्रकरणे दाखल झाली असून यातील 1 हजार 422 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. यातून 16 कोटी 29 लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. तर पुणे ग्रामीण कार्यालयात 362 प्र्करणे दाखल झाली असून यातील 276 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. यातून 6 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
दि. 29 फेब्रुवारीपर्यंत जादा सवलत
अभय योजनेच्या पहिल्या टप्प्याची मुदत दि. 29 फेब्रुवारीपर्यंत असून या मुदतीमध्ये जादा सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन नोंदणी सहमहानिरीक्षक काटकर यांनी केले आहे.
विभागनिहाय राज्यातील स्थिती
विभाग – निर्गत प्रकरणे – वसूल (रुपये)
मुंबई – 10,018 – 30 कोटी 41 लाख
कोकण – 3,999 – 19कोटी 64 लाख
पुणे -3,579 – 31 कोटी 33 लाख