पुणे -गाण्यांचे रेकॉर्डिंग करताना वादकांनी प्रत्यक्ष वाजवणे जवळपास बंद झाले. बहुतांश संगीत की-बोर्डवर दिले जाते. मध्यंतरीच्या काळात सर्व “डिजिटली’ सुरू झाले. वादकांचे काम आणि वादकांच्या प्रत्यक्ष प्रयत्नांनी गाणे आणखी मोठे होते. यामुळे वादकांचे “लाइव्ह’ संगीत असणारे सुमारे 50 वर्षांपूर्वीचे युग पुन्हा आणण्यासाठी सर्व संगीतकारांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अजय-अतुल यांनी व्यक्त केले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने “ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन करण्यात येत आहे. यांतर्गत सोमवारी प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अजय-अतुल यांची मुलाखत झाली. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अजय-अतुल यांनी लहानपण पुण्यातील गणेशोत्सव, संगीत क्षेत्रातील प्रवास, विविध गीतांच्या रेकॉर्डिंग आदी विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या.
यावेळी त्यांनी त्यांच्या “विश्वविनायक’ या अल्बमसह जोगवा, सिंघम या चित्रपटांतील गीते गायली. याशिवाय, “देवा श्री गणेशा’ या गाण्याने मुलाखतीची सांगता झाली. गणरायाच्या रुपाबाबत लहानपणापासूनच आकर्षण वाटायचे. गणेशाची मूर्ती पाहून आपलेपणा वाटायचा. पुण्यातील गणेशोत्सवात संस्कार होतात. यामध्ये तुमच्यातील कलागुणांना वाव मिळतो. रेडीओ ऐकून “माझे माहेर पंढरी’ हे गाणे पाठ झाले होते.
ते पहिल्यांदा गणपतीसमोर म्हंटल्याचे अतुल यांनी सांगितले.चित्रपट ही एक इमारत समजली तर त्यामध्ये कथा, पटकथा, संवाद, कलाकार, दिग्दर्शक हे जसे खांब आहे. त्याप्रमाणे संगीतकार आणि गायक हे सुद्धा खांब आहेत. चित्रपटाच्या “बजेट’च्या किमान 10 टक्के “बजेट’ त्यांच्यासाठी ठेवायला हवे, असेदेखील अजय-अतुल यांनी नमूद केले.