मुंबई :- बुलढाणा जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर सुमारे 3 लाख शेतकरी पीक विम्यास पात्र ठरले. मात्र पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीच्या नियमानुसार 72 तासांच्या आत न कळवल्याने किंवा अन्य कारणांनी सुमारे 11 हजार शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही किंवा अत्यंत त्रोटक विमा रक्कम मिळाली.
याबाबत संपूर्ण नुकसानीच्या अहवालाची फेरतपासणी करण्यात येईल, सोबतच पीक नुकसानीची माहिती कळविण्याची मुदत 72 तासावरून 92 तासापर्यंत करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची विधानसभेत माहिती दिली.
यासंदर्भात आमदार श्वेता महाले यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तरात धनंजय मुंडे बोलत होते.
यावेळी धनंजय मुंडे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांनी भरलेला विमा हप्ता, त्यांना मिळालेली रक्कम आदी आकडेवारी सभागृहात सादर केली. त्याचबरोबर संबंधित 11 हजार शेतकऱ्यांना चुकीचा कमी विमा मिळाला किंवा मिळालाच नाही, याबाबत फेरतपासणी करण्याचे निर्देश विभागाला दिले असल्याचे जाहीर केले.