पुसेगाव – लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, राज्य सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे त्याच पद्धतीचा अवलंब मतदारसंघात पाहायला मिळतो. जिल्हाधिकारी, पोलीस खाते, प्रशासकीय अधिकारी प्रचंड दबावाखाली काम करत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात सर्वसामान्यांना धाक दाखवण्याचे व पोलीस कारवाई करण्याचे अनेक प्रकार घडले असून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी रणागंणात उतरणार आहे, अशी घोषणा आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.
राज्याचे माजी जलसंपदा मंत्री व विधानपरिषद सदस्य आ. शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत कोरेगाव विधानसभा मतदारसंघासह राज्यातील विविध घडामोडींवर मत व्यक्त केले. ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या अनुषंगाने राज्याचे अधिवेशन सुरू असताना प्रत्येक पक्षाध्यक्षांनी प्रसार माध्यमांसमोर यशस्वी झालो असे सांगितले आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक स्थानिक पातळीवर होत होत्या. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न सध्याच्या सरकारमधील पक्ष करत आहेत, असा आरोप शिंदे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केला.
मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांना सदिच्छा भेट देत असल्याचे सांगत त्यांनी अभिनंदन केले. ग्रामपंचायत निवडणुकांमधून लोकांचा कल बदलल्याचे चित्र पाहयला मिळाले आहे. मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 27 ग्रामपंचायती निवडून आलेल्या असा ठाम दावा शशिकांत शिंदे यांनी केला. सरपंच आणि सदस्य वेगळ्या गटाचा असल्यावर गावच्या विकासाचा गाडा रुततो, राजकारण वाढले जाते. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर थेट जनतेतून सरपंच पद्धत बंद करण्यात आली होती. शिंदे- फडणवीस सत्तेवर आल्यानंतर थेट जनतेतून सरपंच करण्याची प्रक्रिया अवलंबल्याबद्दल त्यांनी सविस्तर आपले मत व्यक्त केले. कोरेगाव मतदारसंघात जनतेने बदल दाखविला आणि विश्वास ठेवला. 80 टक्क्यापेक्षा अधिक ग्रामपंचायत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विजय झाल्या आहेत, सेत्यांनी स्पष्ट केले.
मेडिकल कॉलेजसंदर्भात मोर्चा काढणार
मेडिकल कॉलेजसंदर्भात दिवसाढवळ्या पडलेल्या दरोड्याचा गुन्हा दाखल केला जात नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही तर संबंधित चोरांना कोर्टात खेचणार आणि खुलासा करायला नक्कीच भाग पाडणार आहे. कार्यकर्त्यांशी बोलून मी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी न्याय दिला नाही तर तोपर्यंत तिथून मी हलणार नाही, अशी भूमिका शशिकांत शिंदेंनी स्पष्ट केली.