पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) ही अत्यावश्यक सेवेमध्ये येते. त्यामुळे यापुढे नागरिकांना वेढीस धरून पीएमपीमधील कर्मचाऱ्यांना संप पुकारता येणार नाही, अशी अधिसूचनाच राज्य शासनाने काढली आहे. त्यामुळे यापुढे संप पुकारला तर कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे.
“पीएमपी बस’ ही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. दररोज लाखो प्रवाशी बसने प्रवास करतात. शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांसह नोकरवर्गाला वेळेत सेवा देण्यात पीएमपीचा मोठा वाटा आहे. शहरातील काही प्रमुख मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक असून, मध्यवर्ती भागासह शहराच्या कानाकोपऱ्यात, डोंगरमाथ्यावर पीएमपी सेवा पुरविते. त्यामुळे एखादी बस बंद पडली किंवा उशीर झाला तरी प्रवाशांचे नियोजन बिघडते.
त्यातच ट्रॅव्हल टाईम कंपनीच्या चालकांकडून दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम, 2023 चे कलम 2 चा खंड (क) चा उपखंड (एक) व (पाच) यासह कलम 4 चे पोट-कलम (1) मधील तरतुदीच्या अधीन राहून महाराष्ट्र शासनद्वारे यापुढे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संपास दि. 26 ऑगस्ट 2023 पासून मनाई करण्यात येत आहे, असा अध्यादेश शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी काढला आहे. त्यामुळे यापुढे कर्मचाऱ्यांना संप चांगलाच महागात पडू शकतो.