पिंपरी – मेकॅनिकल शास्त्रज्ञ असणारे संदेश पोपट भालेराव यांचा चांद्रयान- 3 मोहिमेत योगदान होते. संदेश हे आंबेगाव तालुक्यातील कळंबचे आहेत. परंतु त्यांनी पदवी उद्योगनगरीतून पूर्ण केली. ही मोहीम यशस्वी झाल्यापासून त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केल्याची माहिती संदेश यांचे मोठे बंधू आणि भोसरी विधानसभा प्रमुख प्रा. दत्तात्रय भालेराव यांनी दिली.
संदेश हा शेतकरी कुटुंबातील तरुण आहे. शास्त्रज्ञ संदेश यांचे शिक्षण कळंब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि मलजादेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये पाचवी ते दहावीपर्यंत झाले. अकरावी, बारावी महात्मा गांधी विद्यालय, मंचर येथे झाली. मेकॅनिकल इंजिनियर त्यांनी डी. वाय. पाटील, आकुर्डी येथून केले. जीईटी (गेट) परीक्षा दिल्यानंतर त्यांची इस्रोमध्ये निवड झाली.
भारतीय इस्रो संस्थेत कार्यरत असताना त्यांनी आयआयटी मुंबईतून एम. टेक. केले. सध्या ते श्रीहरिकोटा येथे इस्रो या संस्थेत मेकॅनिकल विभागात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. संदेश हा लहानपणापासूनच हुशार होता. त्यांना शिक्षणासाठी चुलते किसन भालेराव, पांडुरंग भालेराव तसेच चुलत भाऊ कृषी अधिकारी विकास भालेराव आणि ऑटोमोबाइल इंजिनिअर असणारे सचिन भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले.
इस्रो या संस्थेत 2011 पासून ते कार्यरत आहेत. चांद्रयान- 3 ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर संदेश आणि त्यांच्या पालकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संदेश यांच्या कार्याची माहिती मिळाल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयामार्फतही संदेशचे अभिनंदन करण्यात आले.