पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – चिखली-आकुर्डी मार्गावर कस्तुरी मार्केट येथे शुक्रवारी (दि. 25) रात्री अकराच्या दरम्यान भोसरी डेपोच्या पीएमपीचे मागचे चाक निखळून पडले. यामुळे पीएमपी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची चर्चा रात्री नागरिकांमध्ये सुरू होती.
रात्री अकराच्या सुमारास पीएमपीचालक मोकळी गाडी घेऊन चालला असताना चिखली-आकुर्डी मार्गावरील कस्तुरी मार्केट येथे अचानक पीएमपीचे मागचे दरवाजाच्या बाजूचे चाक निखळून पडले. पीएमपी जोरात धावत असल्याने चाक निखळून पुढील बाजूला रस्त्याने धावत गेले. या चौकातून दिवसा प्रवास करताना वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावे लागते. येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जातात. तसेच लहान मोठे पथारीवाले व इतर व्यावसायिक पदपथावर अतिक्रमण करून आपली दुकाने थाटून बसलेली असतात. अशा वेळी घटना घडली असती तर मोठा अपघात झाला असता. परंतु सुदैवाने ही घटना रात्री अकराच्या दरम्यान घडल्याने पीएमपीचा टायर रस्त्याने धावत असताना कोणाला अपघात झाला नाही. पीएमपीचालकाने गाडी थांबवून तो टायर आणून गाडीजवळ उभा केला. त्यानंतर त्याने डेपोत संपर्क साधून मदत मागविली. साधारण अर्धा तासांत दुसरी पीएमपी व मेकॅनिकल येऊन त्यांनी गाडीची दुरुस्ती केली. परंतु पीएमपी प्रशासनाने अशा पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पीएमपीचा नागरिकांच्या जिवाशी खेळ
पीएमपी प्रशासनाने दिवसरात्र प्रवासी वाहतूक करणाऱ्या आपल्या गाड्यांची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक आहे. ज्या गाड्या धोकादाक आहेत अशा गाड्या रस्त्यावर न पाठवता त्यांची योग्य वेळेत दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका पीएमपी प्रशासनाला कोट्यवधी रुपये देत आहे. तसेच त्यांच्या उत्पन्नातून देखील मोठ्या प्रमाणावर पैसे पीएमपी प्रशासनाला मिळत आहेत. असे असताना पीएमपी प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळताना दिसून येत आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
अधिकारीच अनभिज्ञ
पीएमपीचा टायर निखळून पडला परंतु पीएमपीच्या अधिकारीच यापासून अनभिज्ञ असल्याचे त्यांच्याशी बोलल्यानंतर कळले. तर अधिकाऱ्यांनी माहिती न देता केवळ यांना फोन करा, त्यांना फोन करा ते तुम्हाला माहिती देतील अशी उत्तरे दिली. तर काही अधिकाऱ्यांनी ती बस ठेकेदाराची असेल त्यामुळे असे घडले असेल, अशी माहिती दिली. परंतु सर्वसामान्य नागरिक विश्वासाने पीएमपीने प्रवास करतो परंतु तो प्रवास कितपत सुरक्षित आहे याविषयी मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.