मुंबई : राज्यात कोरोनाचा वेग झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. राज्यात लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आणि लॉकडाऊन केले तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगातील परिस्थितीची आढावा वाचून दाखवला. त्यानंतर, इतरही विरोधकांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड खंबीर पाठीराखे बनून उभारले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले. तसेच, तुमचं वजन वापरुन, केंद्राकडून राज्याचे पैसे आणावे, असा खोचक टोलाही लगावला. त्यानंतर, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्याचे आव्हाड यांनी कौतुक केले आहे.
पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय.टिका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत..
त्यास सलाम! सलाम!! सलाम!!!— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2021
पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टिका करणं सोपं आहे, पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत…त्यास सलाम! सलाम!! सलाम !!!, असे भावनिक ट्विट आव्हाडांनी केले आहे.
दरम्यान,राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काल रात्रीच्या संवादावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणं सांगितली नाही. उपाययोजनाही सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.