पुणे – साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. लाडक्या गणपती बाप्पांच्या भोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास आणि मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती तसेच,
प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली. यावेळी आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, यावेळी पहाटे 4 ते सकाळी 6 पर्यंत गायक अविनाश चंद्रचूड, विश्वजित जोशी, सावनी रवींद्र यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. त्यानंतर सकाळी 8 वाजता भजनी मंडळाच्यावतीने उटीचे भजन झाले. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे.
अक्षय्यतृतीयेचा भावार्थ…
अक्षय्यतृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते. अक्षय्यतृतीया या उत्सवाचे पारंपरिक संदर्भ लक्षणीय आहेत.
त्यामागे इतिहास, परंपरा व विज्ञान याचा मनोज्ञ संगम घडून आला आहे. या दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती साजरी केली जाते. तसेच इतिहासात डोकावून पाहिले असता असे दिसते की, या दिवशी परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंतीही विशेषत्वाने साजरी केली जात असते.
या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने कार्य केले अशी आख्यायिका प्रचलित आहे. हा दिवस त्यामुळे ज्ञान परंपरपरेचा सुवर्णयोग मानला जातो.