नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु असलेली सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्ही गटाच्या वकिलांच्या प्रतिवादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल राखून ठेवला आहे.
दोन्ही गटांच्या वतीने एका आठवड्यात लेखी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. अजित पवार गटाकडून मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला, तर शरद पवार गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला.
राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात सुरु असलेला आजचा युक्तिवाद संपला आहे. निवडणूक आयोगाने निर्णय राखीव ठेवला आहे. आमची मत लेखी स्वरूपात द्यायला सांगितले आहे. आता निर्णय निवडणूक आयोगाच्या हाती असल्याचे अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले.
अजित पवार गटाकडून स्पष्ट केले की, संघटनेच मत विचारात घेऊ नका. म्हणजे हे स्पष्ट होते की त्यांच्याकडे संघटना नाही हे त्यांच्या हरण्याचा द्योतक असल्याचे अभिषेक मनु सिंघवी म्हणाले. लोकप्रतिनिधींची संख्या विचारात घेणे चुकीचे होईल. 2019 पासून आमच्यात वाद होते, असे त्यांनी सांगितले आहे. संविधानातील त्रुटी आणि इतर गोष्टी त्यांनी आधी सांगितल्या नव्हत्या, असेही सिंघवी म्हणाले.
एकीकडे सांगता की 2019 पासून वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही पद घेता त्यावेळी काही बोलत नाहीत. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली. मग त्यांच्याशिवाय पक्ष कसा काय असू शकतो, असा सवालही अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला होता.