Devendra Fadnavis – जालन्यातील आंतरवाली ( Antarwali ) सराटी गावात 1 सप्टेंबरला मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांवर लाठीहल्ला करण्यात आला होता. या प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्याकडून त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील लेखी उत्तर सभागृहात सादर केले आहे. तसेच, निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची आणि केलेल्या कारवाईची माहिती दिली.
यावेळी विधानसभेत या प्रकरणाचे लेखी उत्तर सादर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या घटनेमध्ये जवळपास 50 आंदोलक जखमी झाले असून 79 पोलीस जखमी आहेत. त्यामुळे या घटनेत सर्वाधिक पोलीस जखमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी बचावात्मक आणि वाजवी पद्धतीने बळाचा वापर केला.
ज्यामुळे कोणत्याही पद्धतीने गुन्हे सरसकट मागे घेण्यास नकार दिल्याचे या लेखी उत्तराच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. तर, सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल, असे या लेखी निवेदनातून सांगण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आंतरवालीतील मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यास या लेखी उत्तराच्या माध्यमातून असमर्थता दर्शविली आहे. तर त्यांनी आज हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व प्रश्नांची लेखी उत्तरे देत एक प्रकारे पोलिसांची पाठराखण केल्याचेच दिसून येत आहे.
दरम्यान, यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला. परंतु, त्यावेळी काही मराठा आंदोलकांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासनही मंत्र्यांकडून मनोज जरांगे यांना देण्यात आले. मात्र, आता या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.