मुंबई: वाधवान प्रकरणामुळे विरोधी पक्ष भाजप आता चांगलाच आक्रमक झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले आहे. राज्यात बलाढ्य आणि श्रीमंतांना लॉकडाऊन नाही काय, असा सवाल उपस्थित करत पोलिसांची अधिकृत परवानगी घेउनच काही जण महाबळेश्वरला सुट्टीसाठी गेले. इतक्या मोठ्या चुकीचे परिणाम काय होतील याची माहिती असताना इतका वरिष्ठ आयपीएस अधिकारी असे कृत्य करेल असे वाटत नाही. अर्थातच गुप्ता याला जबाबदार आहेतच. पण हे नेमके कोणाच्या आशिर्वादाने घडले याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
भाजपा नेते किरिट सोमैया यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच संशयाची सुई रोखली आहे. शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय वाधवान कुटुंबाला गृहसचिवांकडून परवानगीचे पत्र मिळणे अशक्य आहे. पवार आणि वाधवान कुटुंबियांचे संबंध जगजाहीर असल्याचा आरोप सोमैया यांनी केला आहे. या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी सोमैया यांनी केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.