मुंबई – शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही फुट पडली आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर आता राष्ट्रवादीमधील वातावरण चांगलच तापायला सुरुवात झाली आहे. शरद पवारांसोबत असलेल्या नेत्यांनी ऍक्टिव्ह होत काही नेत्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय जाहीर करताच अजित पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेत काही नव्या नेमणूक करत असल्याची घोषणा केली.
राष्ट्रवादीमध्ये आता शरद पवार आणि अजित पवार या दोन्हही नेत्यांकडून जोरदार राजकारण सुरु असताना नवीन घडामोडी समोर येताहेत. एकीकडे शरद पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी सुनीत तटकरे यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. अशात अजित पवार यांना ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यांनी त्या प्रश्नाला रोखठोकपणे उत्तर दिलं आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे तुम्ही विसरलात का? त्या संदर्भात काल निर्णय केलेला आहे. काल प्रफुल पटेल बोलले. मी सुद्धा 1999 पासून पक्षाची स्थापना झाल्यापासून भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कामाला सुरुवात केली. आजपर्यंतच काम उभ्या महाराष्टाने पाहिलं आहे. प्रफुल पटेल यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची निवड केली आहे.’ असं अजित पवार यावेळी म्हणाले.