नवी दिल्ली – गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. राज्य आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार बलसाड आणि नवसारी जिल्ह्यांतील काही भागांत 24 तासांत अत्यंत मुसळधार पाऊस झाला. या पावसाशी संबंधित दुर्घटनांत आतापर्यत 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक गावे जलमय झाल्याने व रस्ते पाण्याखाली गेल्याने तेथील संपर्क तुटला आहे. येथे अडकलेल्या पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून (एसडीआरएफ) दिवस-रात्र मदतकार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
सध्या जामनगर हा सर्वात जास्त प्रभावित जिल्ह्यांपैकी एक आहे. शुक्रवारपासून पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात सरासरी 32 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात सध्या सुरु असलेला पाऊस पुढील काही दिवसांमध्ये आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.