पिंपरी -शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना धरणात 28.60 टक्के इतका पाणीसाठा आहे. जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा हा साठा असून गतवर्षीच्या आजच्या तारखेला 28.77 टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. पाणीसाठा पुरेसा असला तरी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात केले आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या पवना धरणामध्ये यंदा मे अखेरपर्यंत दिलासादायक पाणीसाठा आहे. यावर्षी पाणलोट क्षेत्रात यंदा दोन हजार 777 मिली मीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे तीन वेळा धरण शंभर टक्के भरले होते. तर, गतवर्षी दोन हजार 722 मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्यावर्षीपेक्षा 55 मिमी पावसाची अधिक नोंद झाली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत पवना धरण तुडुंब भरले होते.
पवना धरणात सध्या 28.60 टक्के
पाणीसाठा आहे. आंद्रा धरणातून 50 एमएलडी पाणी पुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे शहरवासीयांना सध्या तरी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत नाही. मात्र, कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी शहराच्या विविध भागातून येत आहेत. पावसाळ्याचे आगमन लांबल्यास किंवा पुरेसा पाऊस न झाल्यास अडचण निर्माण होऊ शकते.
ऊन्हाळा संपण्यास काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. सध्या पवना धरणात 28.60 टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. मात्र, नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.
– समीर मोरे,शाखा अभियंता, पवना धरण