बेळगाव : देशात सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीचे पडसाद राज्यातही उमटत असताना दिसून येत आहेत. दरम्यान,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील इथे प्रचारासाठी पोहचले आहेत. त्यातच बेळगाव दौरा करुन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहोचल्यानंतर एक विधान केले आहे, त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
राज्यात सत्ता संघर्ष सुरु असताना ‘मी पुन्हा येईन’ असा नारा फडणवीस यांनी दिला होता. त्याचाच संबंध जोडत पुन्हा एकदा फडणवीसांनी मी पुन्हा येईन असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चंदगडमध्ये बोलताना फडणवीसांनी, “मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे”. आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंदगडमधील निट्टूर गावात हे वक्तव्य केले. सीमाभागात दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी नरसिंह मंदिराला अचानक भेट दिली.
चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या आग्रहाखातर भगवान श्री नृसिंह जयंतीचे औचित्य साधून फडणवीस चंदगड तालुक्यातील निट्टूर (ता.चंदगड) येथील प्रसिद्ध नृसिंह मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
तसेच निट्टूर येथील नृसिंह मंदिर परिसराच्या विकासासाठी लवकरच आराखडा तयार करुन निधी उपलब्ध करुन देणार अशी घोषणा केली. त्याचबरोबर यावेळी त्यांनी शिवाजीराव पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच चंदगडला पुन्हा एकदा येणार असल्याचे सांगितले.