मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून सुरु झालेला वाद आता चक्क बाबरी मशिद प्रकरणापर्यंत येऊन ठेपला आहे. संजय राऊत यांनी बाबरी मशीद पाडली त्यावेळी भाजपवाले पळून गेले होते असा आरोप केला होता. तर त्यांच्या आरोपांना चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद शिवसैनिक किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी पाडली नाही असे उत्तर दिले. त्यानंतर आता हावाद चिघळत चालला असल्याचे दिसत आहे. कारण आता उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी बाबरी पाडली, तेव्हा सगळे उंदीर बिळामध्ये लपले होते, असे म्हणत भाजपला सणसणीत टोला लगावला आहे.
माध्यम प्रतिनिधींशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी,”बाबरी पाडल्यानंतर इतकी वर्षे उलटली. त्यानंतर आता खंदकातले उंदीर बाहेर येत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी जो काही उल्लेख केला तो उल्लेख म्हणजे बाबरीच्या आठवणीतून बाहेर पडणं आहे. असे बरेच उंदीर आता बाबरीच्या आठवणीतून बाहेर येत आहेत. ज्याला काही अर्थ नाही. जेव्हा बाबरी पडली तेव्हा तिथे आपले आत्ताचे माननीय पंतप्रधान हे त्यावेळी हिमालयात गेले असावेत. कारण त्यांचंही नाव समोर आलं नव्हतं. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं ते वक्तव्य चुकीचं म्हणजे साफ चुकीचं आहे” असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
‘बाबरी पाडली तेव्हा शिवसेना नव्हतीच’ या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी चोख उत्तर देत भाजपचा समाचार घेतला आहे. तसेच त्या घटनेविषयी बोलताना ‘सुंदर सिंह भंडारी यांनी अंगलट काही यायला नको म्हणून जाहीर केलं होतं की बाबरी पाडण्यात शिवसैनिकांचा सहभाग होता. ही बातमी आली तेव्हा मी स्वतः हजर होतो. संजय राऊत यांचा फोन आला होता. बाळासाहेबांना मी सांगितलं की बाबरी पाडली. बाबरी पाडल्यावर बाळासाहेबांना फोन आला होता ते म्हणाले जर शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला अभिमान आहे. बाळासाहेबांनी फोन ठेवला आणि म्हणाले हे कसलं नपुंसक नेतृत्व? असं नेतृत्व असेल तर हिंदू उभा राहणार नाही. उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये ही टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
त्यावेळी कुणी शाळेच्या सहलीला गेले होते आणि सांगतात माझ्या आजूबाजूने गोळ्या गेल्या होत्या. कोणी म्हणतं या तुरुंगात होतो, कुणी म्हणतं त्या तुरुंगात होतो. इतके दिवस का गप्प होतात? मोगलांचा इतिहास पुसता पुसता हा भरकटलेला पक्ष हिंदूंचा इतिहासही पुसणार आहेत का? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. बाबरी पडल्यानंतर जी दंगल मुंबईत उसळली त्यावेळी शिवसेनेने मुंबई आणि मराठी वाचवली आहे.
मला भाजपाची खरंच कीव येते. मोहन भागवत मदरशांना भेटी देत आहेत. भाजपाचे लोक मशिदीत जाऊन कव्वाली ऐकणार आहेत. आता बाबरी पण आम्ही पाडली म्हणत आहेत. मग मला आता यांनी सांगावं की यांचं हिंदुत्व नेमकं कोणतं? मी कायमच सांगतो की शेंडी जानव्याचं हिंदुत्व आमचं नाही. असं भाजपावाले सांगू शकणार आहेत का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.