पुणे – “राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात चांगले काम सुरू आहे. आतापर्यंत त्यांच्या एका बाजूला देवेंद्र फडणवीस होते, तर दुसरी बाजू मोकळी असल्यामुळे मी तिथे जाऊन उभा राहिलो. त्यात चुकले काय? सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमी एक असू,’ असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
“चांदणी चौक मार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमास प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री येऊ शकले नाहीत, याची नोंद सर्वांनी घ्यावी. नाहीतर ते फुगून बसले, रूसून बसले, असेच झाले, तसेच झाले अशा बातम्या सुरू होतील,’ अशी टिप्पणी पवारांनी करताच कार्यक्रमात एकच हशा पिकला.
दरम्यान, या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी वार यांनी एक बैठक घेतल्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू झाली. त्यावर पवार म्हणाले, “मीटिंग मी घेतली तर तुमच्या पोटात का दुखते? आम्ही दोघांनी कोणतीही मीटिंग घेतली तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत. आता कुठे विरोधी पक्षनेते नाही झाले, तर त्यांना आमच्यात कुठे कोल्डवॉर दिसले? या दोघांचा डोळा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे, असे एक म्हणतो, “आम्ही बेअक्कल आहे का? खुर्ची एक असेल तर दोघांचा डोळा कसा असेल? महत्वाचे म्हणजे ती खुर्ची भरलेली आहे ना? मग प्रश्न येतो कुठे, असे सांगत पवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला. आम्ही खुर्चीपेक्षा कामाची माणसे आहोत, कामाला वाहून घेतलेले आहे,’ असेही पवार यांनी सांगितले.
विकासप्रकल्पांना भूसंपादनाचा अडसर
“शहरातील दोन्ही रिंग रोड आणि पुरंदर विमानतळाचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, भूसंपादनामुळे काही अडचणी येत असून, नागरिकांनी यामध्ये सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. परदेशातील गुंतवणूक पुण्यात येऊ पाहत आहे. त्यासाठी रस्ते पाहिजे, विमानतळ पाहिजे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन पवार यांनी केले.