मुंबई – वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमावले, ते एका मिनिटात मुलांनी घालवले. त्याला कोण जबाबदार आहे कोण नाही हे निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर समजेल. पण निवडणूक चिन्ह तात्पुरते का होईना, गोठवले जाणे हे क्लेशदायी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेच्या वादाच्या संदर्भात व्यक्त केली.
राज्यातले वातावरण राजकीयदृष्ट्या अस्थिर आहे. असे राजकारण गेल्या 30 – 40 वर्षांत राज्यात कधीही पाहिले नाही. एकमेकांच्या विरोधात व्यक्तिगत पातळीवर आरोप करण्याचे प्रकारही कधी झाले नाहीत. विरोधासाठी विरोध व्हायचा. पण नंतर सगळे एकत्र यायचे. आता शत्रुत्व असल्यासारखेच सगळे चालू आहे. चिन्ह गोठवणे, आपल्याच पक्षात अशी बंडखोरी करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.
राज्याच्या हिताच्या दृष्टीने हे योग्य नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले. आयुष्यभर बाळासाहेब ठाकरेंनी कष्ट घेतले. धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या धनुष्यबाणाच्या जोरावर महाराष्ट्रात सत्ता काबीज केली. राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले. पण ही वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणात गोठवली गेली. यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा, अशा शब्दांत एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली.