श्रीनगर – अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघात शनिवारी ५३ टक्के मतदान झाले. त्यामुळे जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या सर्व ५ जागांसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. त्या सर्व जागांसाठी मिळून ५८ टक्के मतदान झाले. त्याची ४० वर्षांतील सर्वांधिक म्हणून नोंद झाली आहे.
याआधी जम्मू-काश्मीरमध्ये २०१४ या वर्षी सर्वांधिक ४९ टक्के मतदान नोंदले गेले होते. यावेळी तो आकडा खूप मागे पडला. जम्मू-काश्मीरात २०१४ च्या खालोखाल १९९६ मध्ये ४७.९९ टक्के मतदान झाले होते. मागील निवडणुकीत (वर्ष २०१९) अनंतनाग-राजौरीमध्ये अवघे ९ टक्के मतदारांनी हक्क बजावला होता.
यावेळी त्या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती नशीब आजमावत आहेत. त्यामुळे तो मतदारसंघ लक्षवेधी ठरला. जम्मू-काश्मीरमधील लोकसभेच्या सर्व जागांसाठी मिळून ८७ लाखहून अधिक मतदार मतदान करण्यास पात्र होते.
यावेळी मतदानाचा टक्का वाढल्याने निकालाची उत्सुकता आणखीच बळावली आहे. शांततेत पार पडलेले मतदान हे जम्मू-काश्मीरमधील प्रक्रियेचे वैशिष्ट्य ठरले.