मुंबई – मागील वर्षी मुख्यमंत्री खासगी लोकांना सरकारी खर्चाने घेऊन दावोसला गेले होते. मुख्यमंत्र्यांनी विदर्भात 90 हजार कोटी पेक्षा अधिकची गुंतवणूक करुन पाच मोठ्या प्रकल्पाचे करार झाल्याचे तेव्हा जाहीर केले होते. आज एक वर्ष होऊन गेले, तरी सुद्धा पुढे काहीच झाले नाही. आता पुन्हा यावर्षी दावोसला जाऊन करार करण्याचा गाजावाजा सुरू झाला. मागील वर्षीच्या कराराचे काय झाले? याचे उत्तर सरकारने अगोदर द्यायला हवे, अशा शब्दांत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार अनिल देशमुख यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत शिंदे सरकारवर निशाणा साधला. अनिल देशमुख म्हणाले, मकर संक्राती सणाला तिळगूळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणण्याची परंपरा आहे. परंतु ती परंपरा आता राजकारणातून हद्दपार होत असल्याची स्थिती आहे.
मागील वर्षी जागतिक आर्थिक परिषदेत विदर्भासाठी भद्रावती येथे 20 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा कोल गॅसिफिकेशन प्रकल्प, वळद येथे 5500 कोटींचा वळद फेरो अलाईड प्रकल्प, गडचिरोली जिल्ह्यात 20 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा लॉयड मेटल्स प्रकल्प, नागपूर जिल्ह्यात बुटीबोरी येथे 18 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा आरई पॉवर प्रकल्पाबाबत सामंजस्य करार करण्यात आले होते.
मागील वर्षी मुख्यमंत्री खाजगी लोकांना सरकारी खर्चाने घेऊन दावोसला गेले होते. मुख्यमंत्र्यांनी विदर्भात 90 हजार कोटी पेक्षा अधिकची गुंतवणूक करुन पाच मोठ्या प्रकल्पाचे करार झाल्याचे तेव्हा जाहीर केले होते. आज एक वर्ष होऊन गेलं, तरी सुद्धा पुढे काहीच झालं नाही. आता पुन्हा यावर्षी…
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 15, 2024
अमरावती जिल्ह्यात टेक्सटाईल्स पार्कची घोषणा करण्यात आली होती. या सर्व प्रकल्पांमध्ये जवळपास एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. यावरून त्यांनी सरकारला कोंडीत पकडले आहे.