नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदावर अनिल देशमुख हेच कायम राहतील, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. फेब्रुवारीच्या मध्यात अमुक एका अधिकाऱ्याकडून गृहमंत्र्यांकडून अशी सूचना केल्याची माहिती मिळाली, असे परमवीरसिंग यांच्या पत्रात म्हटले आहे. पण पाच ते 15 फेब्रुवारी या काळात अनिल देशमुख हे करोना झाल्यामुळे रुग्णालयात दाखल होते. त्यानंतर ते गृह विलगीकरणात होते. त्यामुळे परमबीरसिंग यांनी केलेल आरोप खोटे आहेत, त्यामुळे देशमुख यांचा राजीनामा मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
ज्या काळात हे आरोप करण्यात आले त्या काळात देशमुख हे रुग्णालयात होते. त्यामुळे जी मागणी केली, त्याला काही अर्थ उरत नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. मुकेश अंबानी बॉम्ब धमकी प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक पथकाने दोन जणांना अटक केली आहे, असे सांगून पवार यांनी पुस्ती जोडली की, एटीएसचा तपास योग्य दिशेने सुरू आहे, असे मला वाटते.
या तपासाच्या प्रगतीत सत्य बाहेर येईल, असे सांगून पवार म्हणाले, अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या मूळ प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होत आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. परमवीरसिंग यांनी देशमुख यांच्यावर केलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे त्या बाबतचा निर्णय घेणे सोपे नव्हते.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने शरद पवार यांच्या वक्तव्यावर पुन्हा टीकेची झोड उठवली आहे. पवार यांच्या म्हणण्यानुसार जर देशमुख हे पाच ते 15 फेब्रुवारी या काळात रुग्णालयात होते आणि 16 ते 27 फेब्रुवारी या काळात गृहविलगीकरणात होते तर 15 फेब्रुवारीला त्यांनी पत्रकार परिषद कशी घेतली, असा सवाल त्या पक्षाने केला आहे. मालवीय यांच्या या ट्विटकडे लक्ष वेधले असता, राष्ट्रवादीचे प्रमुख त्रासिक नजरेने पहात म्हणाले, त्या काळात देशमुख हे रुग्णालयात होते, असे मला सांगण्यात आले आहे.
शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे निर्णय घेतील असे रविवारी सांगितले होते. त्यानंतर सायंकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवार यांची रात्री बैठक झाली.
सिंग यांची अलीकडेच मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावारून उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना एक इ मेल पाठवला. त्यात, सचिन वाझे याला महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते. त्यात 50 ते 60 कोटी बार आणि हॉटेल मालकांकडून गोळा करण्यास सांगितले होते, असा दवा करण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्रात एकच राजकीय खळबळ उडाली होती.
हे तर पक्षाचे मत
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्र्यांनी सचिन वाझे याला 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे, त्यावरून भारतीय जनता पक्षाने राज्यात गृहमंत्र्यांच्या राजिनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारने हा राज्य सरकारला बदनाम करण्याचा कट असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, देशमुख यांनी सध्या तरी राजीनामा देण्याची गरज नाही, असे पक्षाचे मत आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर देशमुख यांच्याबाबत निर्णय घेण्यात येईल.